पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपल्याने तसेच वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सुरुवात झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
पक्षनिष्ठेपेक्षा सत्तेचा सोपान गाठणेच महत्त्वाचे असल्याने अनेक इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. सन 2017 साली ज्यांनी कोलांटउड्या मारल्या त्यांनी घरवापसीसाठी तयारी चालविली आहे. तर काहीजणांनी पुन्हा महापालिकेत “कमळ’ फुलण्याची शक्यता गृहीत धरून “भाजपा’मध्ये जाण्याची तयारी चालविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. पंधरा वर्षे एकहाती सत्ता गाजविणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर मात करत भाजपाने गतवेळी झालेल्या निवडणुकीत महापालिकेत एकहाती सत्ता मिळविली होती.
त्यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता होती तर मोदी लाटही जोमात होती. पाच वर्षानंतर बरीच राजकीय उलथा-पालथ झाल्याने मोदी लाटही काही प्रमाणात ओसरली आहे तर राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार आहे. गतवेळी राष्ट्रवादीच्या अनेक आजी-माजी नगरसेवकांनी भाजपाचे कमळ हाती घेत महापालिकेत एंट्री केली होती.
पाच वर्षांत भाजपसोबत सत्तेची फळे उपभोगल्यानंतर आता अनेकांना “घरवापसी’ची स्वप्ने पडू लागल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वॉर्ड रचना आणि आरक्षण हे कळीचे मुद्दे असले तरी अनेकांनी स्वत: किंवा आपल्या पत्नीला मैदानात उतरविण्याची तयारी चालविल्याने काहीजणांचे पक्षांतर नक्की समजले जात आहे. केवळ सत्तेसोबत राहणे एवढेच उद्दिष्ट ठेऊन या उड्या पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पूर्वी सत्तेपेक्षा पक्षनिष्ठेला अधिक महत्त्व होते तर सध्या पक्षनिष्ठेपेक्षा सत्तेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या समाजकारण आणि राजकारणाचीच परिभाषा बदलली आहे. पूर्वी सामाजिक कार्याची आवड असणारेच राजकारणात येत. ते एखाद्या पक्षाच्या झेंड्याखाली आपली आवड जोपासत. कधीही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षाचे काम केले जात होते. मात्र, सध्याची परिस्थितीच बदलली आहे. जेथे सत्ता मिळेल तेथेच आपले वास्तव्य या भावनेतूनच सध्या पक्षांतराची स्पर्धा रंगू लागली आहे.
1999 पूर्वी शहरावर कॉंग्रेसचे प्राबल्य होते. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा पक्षांतर झाले. त्यानंतर वारंवार पक्षबदल सुरूच राहिले. सर्वाधिक पक्षांतर हे 2017 साली झाले. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येत्या पंधरा दिवसांत वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार होणार असून त्यापुढील पंधरा दिवसांत आरक्षण जाहीर होईल. यानंतर कितीजणांचे पक्षांतर होते आणि कितीजण पक्षनिष्ठा जपतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पक्षनिष्ठेचे ओझे कोणाच्या गळ्यात?
राष्ट्रवादीसोबत अनेक वर्षे राहिल्यानंतरही साधे महापालिकेचे तिकीट न मिळालेले अनेकजण आजही प्रतिक्षेत आहेत. तर राष्ट्रवादीवर नाराज झाल्यानंतर गतवेळी भाजपामध्ये आल्यानंतरही अनेकांना पदापासून वंचित रहावे लागले. ज्यांना फळे मिळाली त्यांनीही उड्या मारल्या तर काहीजणांनी नाराजीतून पक्षांतराच्या उड्या मारल्या. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत पक्षनिष्ठेचे ओझे नेमके कोण बाळगणार आणि कोण पक्षांतर करून सत्तेचे सोपन गाठणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
काहीजणांची पक्षनिष्ठा कायम
शहरातील प्रमुख पक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपामध्ये आजही अनेकजण पक्षासोबत निष्ठेने काम करत आहेत. त्यामध्ये काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. येत्या निवडणुकीत या प्रमुखांची पक्षनिष्ठा कायम राहते की ते देखील सत्तेच्या प्रवाहात स्वत:ला झोकून देणार याकडे आता सर्वसामान्यांसह राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.