– ह.भ.प. गणेश म. भा. फड
एऱ्हवीं पाहें पां पंडुसुता । या यज्ञो पहारां समस्तां । मीवांचूनि भोक्ता । कवणु आहे ।। मी सकळां यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधी । कीं माते चुकोनि दुर्बुद्धी । देवां भजले ।। गंगेचे उदक गंगे जैसें । अर्पिजे देवपि तरोद्देशें । माझें मज देती जैसें । परि आनानीं भावीं ।। म्हणोनि तें पार्था । मातें न पवतीचि सर्वथा । मग मनीं वाहिलीं आस्था । तेथ आले ।।
ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात माऊली म्हणतात, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, एरव्ही अर्जुना, असे पाहा की या सर्व यज्ञातले उपचार भोगणारा माझ्यावाचून दुसरा कोणी आहे का? यज्ञांच्या आरंभी मी आहे. अखेरही मीच. परंतु हे याजिक लोक मला दूर करून इतर देव-देवतांना का भजतात?
देवासाठी, पितरांसाठी गंगोदक हाती घेऊन गंगेतच अर्घ्यरूप सोडतात. हे भक्त माझे मलाच देतात. भावना वेगळी असते एवढाच फरक आहे. हे मजपर्यंत कधीच येत नाहीत. अंत:करणात जी इच्छा बाळगलेली असते, ती गती मिळते.