लेह: लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस पक्ष राजकारण करत आहे, अशी टीका लडाखचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी केली आहे. या तणावाच्या मुद्द्यावर सरकार शांत बसलेले नाही. केवळ योग्य व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित केला जावा, अशी सरकारची इच्छा आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्री संसदेमध्ये सविस्तर उत्तर देतील, असेही नामग्याल यांनी सांगितले.
भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष ताबारेषेबाबत संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर सरकार काम करत आहे. या संदर्भातील मुद्दा कॉंग्रेस पक्षाकडून उपस्थित केला जातो आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. सर्जिकल स्ट्राईक असो अथवा देशाच्या संरक्षणाबाबतचा कोणताही मुद्दा असो, कॉंग्रेस पक्षाला केवळ पुरावेच हवे असतात, अशी टीकाही नामग्याल यांनी केली आहे.
सरकारला कोणत्याही व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करायचा नाही आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच या संदर्भात संसदेमध्ये सविस्तर उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने चीनला एक इंचही भूमीवर ताबा मिळवू दिलेला नाही. सरकार देशाच्या संरक्षणाबाबत अजिबात नमते घेणार नाही, याची देशाने खात्री बाळगावी असेही ते म्हणाले.