मुंबई : इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे राजकारण्यांनी मतदारांना गृहीत धरू नये असा सल्ला देत देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला.
गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलेल्या “मी पुन्हा येईन’ या घोषणेचीही त्यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, हा पवित्रा मतदारांना उध्दटपणा वाटला. त्यांनी धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीत मतभेद असल्याचा विरोधकांचा आरोप हा सत्याचा अपलाप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, या सरकारचा मी कधीही हेडमास्टर नव्हतो. अथवा रिमोट कंट्रोलही नव्हतो व नाही. ठाकरे आणि त्यांचे मंत्रीमंडळ हेच सरकार चालवत आहेत.
शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या “सामना’चे संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. त्याचा पहिला भाग शनिवारी प्रकाशित झाला. सामनामध्ये प्रथमच शिवसेनेतर नेत्याची मॅरेथॉन मुलाखत प्रकाशित होत आहे. यापुर्वी केवळ बाळासाहेब आणि उध्दव ठाकरे यांच्याच अशा मुलाखती प्रकाशित झाल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या गेल्या विधानसभेत झालेल्या पराभवाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, लोकशाहीत तुम्ही कायम सत्तेवर राहाल अशा भ्रमात राहून चालत नाही. जनतेला गृहीत धरलेले आवडत नाही. इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या लोकनेत्यांनाही जनतेने पराभूत केले आहे. जनता राजकीय नेत्यांपेक्षा हुषार आहे, असा त्याचा लोकशाही हक्काच्या दृष्टीने अर्थ आहे. जर आपण राजकारण्यांनी मर्यादा ओलांडली तर जनता आपल्या धडा शिकवते. त्यामुळेच जनतेला मी पुन्हा येईन सारख्या वल्गना आवडत नाही.
महाराष्ट्रातील सत्ताबदल हा अपघात नव्हता असे सांगून पवार म्हणाले, देशाच्या भावनेप्रमाणेच लोकांनी लोकसभेला मतदान केले. मात्र विधानसभेला त्यांचा मूड बदलला. त्यामुळे लोकसभेला भरघोस यश मिळवून विधानसभेला ते कायम राखणे जमले नाही. महाराष्ट्रातील जनतेचा कौलही बदलाच्या बाजूने होता.
राज्यातील लॉकडाऊन वरून मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जाते, त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, अजिबात नाही. कसले मतभेद? आणि कशासाठी? लॉकडाऊनच्या संपूर्ण कालावधीत माझे मुख्यमंत्र्यांसोबत उत्तम संवाद होता तो आजही कायम आहे.