पुणे – पोलिसांनी केलेल्या आवाहनाला नागरिक व गणेशोत्सव मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. यामुळे शहरात गणेशोत्सव काळात गर्दी कमी दिसून येते आहे. हुतात्मा चौक, बेलबाग चौक, दत्तमंदिर चौक, लालमहाल चौक परिसरात गर्दी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पादचारी मार्ग बंद करून पुन्हा सुरू केला जात आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत होते आहे, असा दावा पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केला आहे.
प्रत्येक पंधरा मिनिटांनी गर्दीचा आढावा घेतला जात आहे. मात्र, गर्दी वाढली तर पादचाऱ्यांसाठी अधिक निर्बंध लावावे लागतील, असेदेखील डॉ. शिसवे म्हणाले. शहरातील येरवडा, आंबेगाव, शिवाजीनगर, प्रमुख पेठांचा परिसरातील सुरक्षा व गर्दीचा आढावा त्यांनी स्थळभेटीतून घेतला.
यावेळी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, राहूल श्रीरामे, पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सुनील माने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यंदाही गणेशोत्सवावर करोनाचे संकट आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकादेखील आहे. त्यामुळे सरकारने आचसंहिता तयार केली आहे.
निर्धारित नियमांना अनुसरून नागरिकांना गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांसह मंडळांना करण्यात आले आहे. मंडळांनी श्रींच्या दर्शनाची सोय ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकादेखील यंदा निघणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण दर्शनासाठी बाहेर पडू नये, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सुरक्षा व गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सात हजारांपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीसीटीव्हींद्वारे पोलीस लक्ष ठेवत आहेत.