मुंबई – चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समज देण्यात आली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घटनेतील पोलीस अधिकारी संजय सानप यांची विभागीय चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सदस्य राम सातपुते, मंगेश चव्हाण आणि नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, चुकीच्या बदली आदेशाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना समज देण्यात आली आहे. त्यांनी संबंधित महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित आदेशाचे काम करणाऱ्या लिपिकावर ठपका ठेवण्यात आला आहे.
याशिवाय पोलीस अधिकारी संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेतील इम्रान कुरेशी यांच्याशी त्यांचे काही संबंध आहेत का? याची चौकशी केली जाईल. यामध्ये तथ्य आढळल्यास विशेष कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभे दिली.
सात हजार पोलिसांची भरती
राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.