नीरा -राज्य सरकारने करोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. प्रथम जमावबंदी व नंतर संचारबंदी जाहीर करून लोक एकत्र येणार नाही, याबाबत दक्षता घेतली. त्यानंतर जिल्हाबंदी सुद्धा केली. अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. पण चोर मार्गाचा वापर करीत लोक जिल्हाबंदीचे सर्रास उल्लघंन करीत आहेत.
सातारामध्ये पहिला रूग्ण सापडल्यानंतर सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सातारा आणि पुणे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या वाढत आहे. सातारामध्ये पुण्यातून गेलेल्या लोकांमुळे करोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस जागता पहारा देत आहेत.
मात्र, पुणे- सातारा सीमेवर नीरा नदीकाठी पोलीस पहारा देत असले तरी नीरा नदीकाठच्या दत्त मंदिराच्या पश्चिम बाजुकडून व रेल्वे मार्गाचा उपयोग करीत लोक नीरा शहरात प्रवेश करीत आहेत. बारामती तालुक्यातील निंबुत येथील बंधारा व पुरंदरमधील पिंपरे व जेऊर येथील बंधाऱ्याचा उपयोग करून दोन्ही जिल्ह्यातील लोक अलिकडे पलिकडे करीत आहेत.त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेवरचा ताणही वाढवत आहेत.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हाबंदीचे उल्लंघन
लॉकडाऊननंतर लोकांच्या दैनंदिन गरजांसाठी शासनाने काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना पास दिले. या पासचा दुरूपयोग होत असल्याचे फलटण तालुक्यात सापडलेल्या करोना रूग्णाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. पुणे येथे अग्नीशमन दलात काम करणारा जवान पुणे ते फलटण दररोज ये- जा करीत होता. तिथे त्याने आपल्या कुटुंबासमवेत इतरांचा जीव धोक्यात घातला. तरकारी व फळ विक्रेते जिल्हाबंदीचे उल्लघंन करीत तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत नाहीत.