व्यावसायिक अभ्यासक्रमांची चाल कासवगतीने ः शिक्षणपद्धतीत बदलाची गरज
रांजणी – सध्याच्या विरोधाभास शिक्षण पद्धतीमुळेच बेरोजगारीत वाढ होत आहे. अलीकडील काळात देशातील आणि राज्यातील शिक्षण पद्धतीने अनेकांना अचंबित केले आहे. खरेतर देश-विदेशात भारतीय डॉक्टर आणि इंजिनिअर यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर दुसरीकडे बेकारी देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतीय शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचे आहे.
उत्कृष्ट कौशल्य विकसित करण्यात एक वर्ग कमी पडतो. तर दुसरा वर्ग मात्र यशाची शिखरे पदाक्रांत करत असल्याचे वास्तववादी चित्र देखील पहावयास मिळत आहे. हा वर्गीय आणि स्थायीभाव लक्षात घेता सध्याच्या शिक्षण क्षेत्रात बोकाळत चाललेली विशिष्ट प्रकारची वैचारहीन पद्धत संपवावी लागणार आहे, अन्यथा शिक्षण पद्धतीतील दरी सातत्याने रूंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे. शिक्षणामुळे मनुष्य वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ बनतो. त्याच्याकडे सारासार विचार करण्याची क्षमता येते, किंबहुना या कारणांमुळेच त्याला रोजगाराचीही संधी मिळते.
15-20 वर्षापूर्वी शिक्षण घेतलेल्या तरूणांना सरकारी नोकरी हेच महत्त्वाचे रोजगाराचे साधन होते.
त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेतून पदवी घेणाऱ्या तरूणांना देखील नोकरीच्या संधी मिळायच्या. गेल्या पाच-सहा वर्षात हे चित्र पालटले आहे. सरकारचे 80 टक्के उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केले जाते हा अनुत्पादक खर्च कसा कमी करता येईल, याचा विचार सरकार गांभीर्याने करत आहे. संगणक, इंटरनेट अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने सरकारी यंत्रणेसाठी कर्मचाऱ्यांनी गरज दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
यापूर्वी जेमतेम शिकलेल्या व्यक्तींनाही सामाजिक दृष्टीकोन ठेवून नोकरी दिली जात होती, परंतू आता सरकारी नोकरीही लायक उमेदवारांना कटाक्षाने देण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. एकूणच सरकारी नोकऱ्या कमी होत असून त्या तुलनेत पगारही अल्प प्रमाणात मिळतो. याउलट खासगी क्षेत्रातील चित्र वेगळे आहे. विशेषत: जागतिकीकरणाचा सकारात्मक फायदा नोकऱ्यांसाठी झाल्याचे दिसून येते.
अलीकडील चार-पाच वर्षाच्या काळात नोकऱ्यांच्या अनेक संधी खासगी क्षेत्रामध्ये निर्माण झाल्या आहेत. करोडो रूपयांची उलाढाल करणाऱ्या कार्पोरेट क्षेत्राने आपले पंख विस्तारले आहेत. या कार्पोरेट कंपन्यांना अधिकाधिक कुशल मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. आयटी, नर्सिंग, कॉलसेंटर, बांधकाम क्षेत्र, बीपीओ, मनोरंजन, पत्रकारिता, इन्शुरन्स अशा क्षेत्रात नोकऱ्यांची दालने उघडली आहेत, परंतू या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे.
प्रशिक्षितांची संख्या अपुरीच
खासगी कंपन्यांना प्रशिक्षित तरुण मिळणे मुश्किल झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला बेरोजगारांची संख्या वाढत आहे. देशात नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहेत; पण त्या नोकऱ्या करण्यासाठी लायक तरुणांची संख्या पुरेशी नाही, असे अत्यंत विचित्र विरोधाभासाचे चित्र देशातील शिक्षण क्षेत्रासमोर आहे. समान ज्ञानाच्या तत्त्वानुसार एक हजार पोलिसांच्या नोकर भरतीसाठी लाखभर उमेदवार अर्ज करतात. सरकारी नोकऱ्या कमी होत असून, त्या तुलनेत पगारही अल्प प्रमाणात मिळतो. राज्यात नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्था कासव गतीने वाढत आहेत.