चंदिगड: पंजाबमधील अमृतसर, बटाला आणि तरनतारन येथे विषारी दारू पिल्याने 21 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण पंजाब हादरले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विषारी मद्य बनवणाऱ्या काही आरोपींना अटक केली आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पंजाब सरकारकडून एक विशेष पथक नेमण्यात आले आहे.
पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता म्हणाले, विषारी दारू पिल्याने 29 जुलै रोजी अमृतसरच्या मुच्छल आणि तंग्रा या ग्रामीण भागात 5 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर 30 जुलै रोजी संध्याकाळी मुच्छल येथे आणखी दोन जणांचा तशाचप्रकारे मृत्यू झाला. यापैकी एका व्यक्तीला रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मुच्छल गावात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बटाला शहरातही दोन जणांचा मृत्यू झाला. बटाला शहरात तर आज आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर तरनतारन येथेदेखील चार जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.
याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी नेमलेल्या विशेष पथकाकडून जलद गतीने तपास सुरु आहे. या घटनेनंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात मद्य तयार करणाऱ्या कारखान्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.