कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील भेडसगाव येथे समाजाच्या मालकीच्या जेवणाच्या भांड्यांच्या देवघेवीतून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही कुटुंबातील चारजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परस्पर विरोधी फिर्यादींनी मारहाण, विनयभंग, तोडफोड, किंमती ऐवजाची लुटालूट केल्याची तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मनिषा राजेंद्र कदम (वय ३०) या महिलेच्या फिर्यादीनुसार राजाराम शिवाजी शेवाळे, शिवाजी विठ्ठोबा शेवाळे, रोहन अर्जुन कदम (सर्व रा. भेडसगाव) तर विरोधी फिर्यादी राजाराम शिवाजी शेवाळे (वय २८) याच्या तक्रारीनुसार शशिकांत शामराव कदम, राजेंद्र शामराव कदम, शामराव लक्ष्मण कदम (सर्व रा. भेडसगाव ता.शाहुवाडी) आशा एकूण सहाजणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेडसगाव येथील संबंधित फिर्यादी व आरोपी हे एकाच समाजातील आहेत. या समाजाच्या मालकीची जेवणाची भांडी देण्या-घेण्यावरून परस्पर वाद वाढत जाऊन त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी एकमेकांच्या घरात घुसून तोडफोड तसेच सोने, व रोकड लुटल्याचे दोन्ही फिर्यादींनी तक्रारीत म्हंटले आहे.
शिवाय मनिषा राजेंद्र कदम या फिर्यादीने शिवाजी, राजाराम शेवाळे पिता-पुत्रासह रोहन कदम या तिघांनी घरात घुसून विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले व सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजाराम थोरात पुढील तपास करीत आहेत.