– श्रीनिवास वारुंजीकर
प्रतिभावान कवी ग्रेस (माणिक गोडघाटे) यांना आपल्यातून जाऊन आज 9 वर्षे झाली. मराठी कवितेला एक नवा चेहरामोहरा मिळवून देणारी आणि आस्वादाच्या पातळीवर एक नवे प्रश्नचिन्ह उभे करणारी ग्रेसची कविता म्हणजे मराठी साहित्यातलं एक मानाचं पान आहे. विविध प्रसंगांमध्ये खुद्द कवी ग्रेस यांनी मांडलेली काव्यनिर्मितीची प्रक्रिया आणि एकूणच कवितेविषयीचे त्यांचे विचार, त्यांच्याच शब्दांत…
कविता ही कोणाला कधीच वारसाहक्काने मिळत नसते. ती अल्पांशानेही कसलीही मिळकत नसते आणि कविता हे कमाईचे साधनही नसतेच. माझी कविता ही मलाही संपूर्णपणे समजते, असे अजिबात नाही. कारण कवितानिर्मिती ही गोष्टच वेगळी आहे. कविता निर्माण झाल्यानंतर ती कवीच्या बाहेर असते. पण कवीच्या आतून ती निर्माण झाल्याने, कवीच्या सर्व पेशींचा, एकत्रित सत्त्वयुक्त ऐवज, त्या कवितेच्या अंगाखांद्यात निर्माण झालेला असतो; आणि तेवढाच ऐवज कवीच्या शरीरामधून उणा झालेला असतो. म्हणूनच मी माझ्या स्वत:च्या कवितेविषयी इतकी कमालीची काव्यनिष्ठा बाळगत असतो.
माझ्या कवितेतून रूपकांची उभारणी आणि रुपकांची बांधणी, यातून प्रसरणशील प्रतिमांचे आणि प्रतिकांचे, संघांच्या संघात निर्माण होत असतात. कुठल्याही एकटं अलंकाराच्या मदतीने, माझ्या कवितेत गतिलय आणि स्थितिलय निर्माणच होत नाही. शब्दांचे जिथे विसर्जन झाले आहे, तिथेच ही रुपकाची पाझरणी झुळूझुळू वाहू लागते आणि शब्दांचे विसर्जन होऊन, काव्याचा अर्थातीत अनुभव सुरू होतो…
माझ्या संपूर्ण सृजनप्रक्रियेत जगाचा पसारा नीटपणे मांडून ठेवलेला तुम्हाला दिसेल. सोबतीला जास्त काळ दु:खाचा काळोख असेल, ज्याचा आरंभ संध्याकाळच्या संधीप्रकाशाने झालेला असायचा. उजेडही नाही आणि अंधारही नाही, अशी तिन्हीसांजेची, अर्थात संध्याकाळची वेळ, ही माणसांची वेळ नसते. ही प्राचीन शक्तींच्या जागरणाची वेळ असते. आत्मे जागे होण्याची वेळ असते. त्या वेळेच्या विजेसारख्या संधीरेषेवर मी उभा राहतो आणि मग निर्मितीशक्तीला आवाहन करणारा कवितेचा बीजमंत्र उच्चारतो. मग धुसर वातावरणातून माझ्याकडे एक विलक्षण दु:खदग्ध असं आकारविहीन, विकारशरण असं अर्थसंचित चालत येतं. या संचितानं माझ्या कपाळावर आपली रक्तखूण उमटवली.
हाच मला मिळालेला प्रतिभेचा वर आणि शापही होता. मग काव्यनिर्मितीचा झंझावात आयुष्यभर माझ्याभोवती गरगरत राहिला. कवितेसाठी मी शब्दांना उचलतो, तो त्यांच्या अर्थगुणांना अनुसरून नव्हे. तो शब्दांच्या नादगुणांचं बोट धरत असे. भाषेच्या सर्व शक्यता पडताळून पाहत, तरल अशा लयींना वळवत, खेळवत, शब्दांमागच्या अर्थभासांभोवती, त्या लयींची आवर्तनं पेरत असताना, अशा संदिग्धतेला आशयाचं वरदान देताना, दु:ख जाणिवेचे सारे पदर उलगडायचे. निर्मितीप्रक्रिया आणि आत्मशोध ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. प्रत्येक प्रतिभावंत कवी, आपल्या निर्मिती प्रक्रियेत आणि अनुभवविश्वातही एकदा तरी, आत्मशोधाच्या टप्प्यावर येतो. भयभीत होतो. त्यावेळी त्याचे भावविश्व, अनुभवविश्व व त्याची निर्मितीप्रक्रिया हे एकमेकांसमोर, जन्मोजन्मीचे दावेदार असल्यासारखे उभे ठाकतात.
याच टप्प्यावर कवीने अत्यंत प्रामाणिकपणे भाषेचा, शब्दांचा हाकारा ऐकायचा आणि फक्त व्यक्त व्हायचे असते. त्यात कसलाही अभिनिवेश आला तर पाण्यासारख्या पारदर्शक कवितेचे पावित्र्य भंग पावते. अगदी सगळी निर्मितीप्रक्रियाच मग नासून जाते.कविता कळायला, समजायला, कवितेने स्वस्त व्हायचे नसते, कवीने आपली पातळी सोडायची नसते. तर आस्वादक वाचकानेही कविता समजून घेण्यासाठी संदर्भाचा अभ्यास करून पूर्वतयारी करणे आवश्यक असते. कोणाही कवीने लिहिलेली कविता वाचकाला ज्याक्षणी कळते, तो क्षण म्हणजेच कवीच्या सृजन क्षणाइतकाच मौल्यवान असतो. अशावेळी कवी आणि रसिक यादरम्यान सांधला जाणारा पूल सोनेरी असतो, रत्नजडित असतो.
अरमान शायरी में दोनों के पिघलते हैं
हम आग में जलते हैं वो बर्फ पे चलते हैं…
कविता लिहिणे म्हणजे इंचाइंचाने मरणे! प्रत्येक कवितेगणिक आणि शेवटी उरणारा कवीच्या देहाचा सांगाडा म्हणजे सोलून-सोलून नक्षीदंत झालेले देहतत्त्वाचे एक सुभाषितच! म्हणून तुम्ही इतरांचे काय ते वाचून घ्या आणि मगच माझ्याकडे या. मी रहस्य शरणार्थी आहे. मी स्वत: एक “फेमिनाइन पोएट’ही आहे. मात्र माझ्या कवितेतलं स्त्रीत्व हे स्त्रीत्वाचं भांडवलही नाही किंवा तक्रारखोरही नाही, ते स्त्री-पुरुष भावनेच्या पलीकडे जाणारे वैशिष्ट्य आहे.
मी आजवर माझ्या कवितांमधून जो काही व्यक्त झालोय, ते माझ्या अभिव्यक्तीचे 5 ते 6 टक्केच प्रकटीकरण आहे. उरलेले 94 ते 95 टक्के अभिव्यक्ती माझ्याबरोबर संपून जाणार आहे. मला समजत नाही, मी काय करू?