ओतूर -“आम्हाला काय कशाची भीती?’ या मथळ्याखाली दैनिक “प्रभात’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनही खडबडून जागे झाले अन् ऍक्शन मोडमध्ये आले. त्याचा परिणम म्हणजे गुरुवार (दि. 25) आठवडे बाजार शिस्तीत पार पडला; पण बाजारात विनामास्क असलेल्यांकडून पोलिसांकडून दंड वसूल करण्यात आला.
ओतूरमध्ये गुरुवारी आठवडा बाजार असल्याने या बाजारात परिसरातून दुकानदार आणि खरेदीदारांची गर्दी होत असते अनेक नागरिक मास्क न लावता बाजारात फिरत असल्याने तसेच दुकानदार देखील मास्क वापरत नसल्याचे वास्तव “प्रभात’ने मांडले होते.
त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले अन् त्यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पोलिसांना मदत घेतली. गुरुवारी विनामास्कवाल्यांना मास्क वापर करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या तसेच काही ठिकाणी दंडात्मक कारवाया देखील करण्यात आल्या असल्याची माहिती सरपंच गीता पानसरे, उपसरपंच प्रेमानंद अस्वार यांनी दिली.