लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका; कंपन्यांना देणार बससेवा
पुणे – लॉकडाऊनमुळे सेवा बंद असल्याने मागील तीन महिन्यांत तब्बल 150 ते 200 कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यामुळे पीएमपीने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उत्पन्नवाढीसाठी कामकाजाचा ट्रॅक बदलला आहे. मालवाहतुकीपाठोपाठ आता पीएमपी खासगी कंपनी कर्मचाऱ्यांची वाहतूक करणार आहे.
लॉकडाऊनमध्ये पीएमपी बसेसची प्रवासी वाहतूक स्थगिती केली आहे. यामुळे कोट्यवधींचा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उत्पन्न वाढीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मालवाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
यापूर्वी पीएमपीने प्रतिमाह किमान 2 हजार किलोमीटर आणि प्रतिकिलोमीटर 83 रुपये 50 पैसे याप्रमाणे दर आकारणी करण्याबाबतचे नियोजन केले होते. मात्र, प्रशासनाचा दर अधिक असल्याने या प्रस्तावाला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने दर कमी केले आहेत. महामंडळाचे उत्पन्न प्रतिकिमी सुमारे 50 रुपये असल्याने, कंपन्यांनादेखील 50 ते 60 रुपये दराने भाडे आकारण्यात येणार आहे.
तीन महिन्यांतील तोटा, बसेसची संख्या, कर्मचारी वेतनाचा खर्च आदींचा विचार करून मनपाकडे कर्मचारी वर्ग करण्यासह कंपन्यांना देखील बसेस देण्यावर भर देण्यात येणार आहे. येत्या काळात किलोमीटरप्रमाणे भाडे न आकारता, उत्पन्नाप्रमाणे भाडे आकारण्याला संचालक मंडळानेदेखील बैठकीत तत्त्वत: मान्यता दिली आहे. कंपन्यांच्या मागणीनुसार डेपोतून बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
– अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी