करोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक संघटनेच्या अहवालात इशारा
पुणे – नजीकच्या काळात उद्भवलेले साथीचे रोग हे मुख्यत: प्राण्यांपासून झालेले आहेत. विविध देशांतून होणारी प्राणी तस्करीचा याच्याशी याचा थेट संबंध आहे. त्यामुळेच वन्यप्राण्यांची अवैध तस्करी वेळीच रोखली गेली नाही तर, आगामी काळात प्राणीजन्य साथीचे रोग तसेच करोनासारखी जागतिक महामारी अधिक वाढेल, असा इशारा जागतिक संघटनेच्या एका अहवालाने दिला आहे.
युनायटेड नेशन्सच्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स, या समितीतर्फे “वन्यप्राण्यांची तस्करी आणि त्यामागे असलेले अर्थकारण’ याविषयावरील एक अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल तयार करण्यात आला असून, गेल्या दहा वर्षातील विविध साथीचे आजार, विविध देशांतून होणारी वन्यप्राण्यांची तस्करी आणि त्यामागे असणारे अर्थकारण या सर्व बाबींचा अभ्यास करत, त्यानुसार विविध शिफारशी या अहवालात करण्यात आल्या आहे. जगभरातील 45 देशांनी या अहवालासंबंधीतील सर्वेक्षणात सहभाग नोंदविला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये आलेले स्वाइन फ्लू, इबोला, सार्स आणि आता प्रादूर्भाव असलेला करोना हे सर्व रोग पाहता, त्यांची सुरवात ही प्राण्यांपासून झाली असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. औषधी उपयोगाकरिता, खाण्याकरिता अथवा इतर काही कारणांसाठी वन्यप्राण्यांची होणारी तस्करी ही यासाठी कारणीभूत असल्याचेही अनेकदा सांगितले जाते. या अहवालातील एक महत्त्वाची शिफारस म्हणजे विविध देशांमधून होणारी प्राण्यांची अवैध तस्करी रोखणे महत्वाचे आहे. अन्यथा, आगामी काळात जगभरात मोठ्या प्रमाणात प्राणीजन्य आजार उदभवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे या अहवालात सांगण्यात आली आहे.
भारतातही तस्करीचे प्रमाण लक्षणीय…
जागतिक बाजारपेठेत तस्करी केल्या जाणाऱ्या प्राण्यांमध्ये वाघ, मांडूळ, खवले मांजर, हत्ती, बिबट, गेंडा, विविध पक्षी यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. भारतातील विविध प्रदेशांमध्ये या प्राणी कमी अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे या प्राण्यांची शिकार करत, त्यांची तस्करी करण्याच्या घटना भारतातही लक्षणीय प्रमाणात घडत असतात. मात्र, अशाप्रकारची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक असणारी प्रभावी यंत्रणा भारतात नाही, अशी खंत अनेकदा पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते.