पुणे -डासांना पळविण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात व्यवस्थापनाकडून चक्क देशी जुगाड वापरला जात आहे. रंगमंदिराच्या आतील बाजूस सायंकाळी नाटक अथवा इतर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी लोखंडीपाटीमध्ये गोवऱ्या, लिंबाचा पाला तसेच काड्या जाळून धूर केला जात आहे. डास मारण्यासाठी धुर फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने हा देसी जुगाड वापरला असल्याचे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बालगंधर्व रंगमंदिरात डासांचा उपद्रव वाढला असून प्रेक्षकांकडून याबाबत तक्रारी करण्यात येत आहेत.
ही बाब दैनिक “प्रभात’ने “टाळ्या ऐवजी डास मारण्याची वेळ’ या वृत्ताद्वारे उघडकीस आणली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने डास रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या मात्र त्यानंतरही डासांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आता हतबल झालेल्या नाट्यगृहांच्या कर्मचाऱ्यांनीच शेणाच्या गोवऱ्या, वाळलेल्या झाडांच्या काट्या तसेच लिंबाचा पाला जाळण्याचा देशी जुगाड सुरू केला आहे.नाट्यगृहाचे प्रवेशद्वारे शटरच्या आतमधील बाजूस असलेल्या व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर लोखंडीपाटीमध्ये हा धूर करून डास पळविण्याचा केवीलवाना प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, या प्रकारामुळे रंगमंदिराच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांकडून काही चूक झाल्यास आग लागण्याचा धोका आहे.