PM Modi on Electoral Bond| लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक रोख्यांची किंवा इलेक्टोरल बाँडचा मुद्दा चांगलाच तापला. इलेक्टोरल बॉण्ड ही योजना सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवत स्टेट बँक ऑफ इंडियाला वारंवार फटकारले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक आयोगाला संबंधित सर्व माहिती शेअर करण्यास सांगितले आहे.
त्यानंतर राजकीय पक्षांनी वटवलेल्या निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला देण्यात आला. त्यापैकी तब्बल पन्नास टक्के निवडणूक रोखे एकट्या भाजपानं वटवले आहेत. यावरून भाजपवर विरोधकांकडून टीका करण्यात आली. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? PM Modi on Electoral Bond|
विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जे लोक याचा विरोध करतायत किंवा गोंधळ घालतायत त्यांना एक दिवस पश्चाताप होईल. कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते. त्यात त्रुटी असू शकतात आणि त्या दूरही केल्या जाऊ शकतात. परंतु, त्यावरून देशभर गदारोळ माजवणाऱ्यांना एक दिवस पश्चाताप होईल.”
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले, “2014 पर्यंत देशातील परिस्थिती गंभीर होती. कारण राजकीय पक्षांना निधी कोण देतंय? त्यांच्याकडे इतके पैसे कुठून येताहेत? याबाबत लोकांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती. परंतु, निवडणूक रोख्यांमुळे देशातील जनतेला राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबतची माहिती मिळत आहे. पैसे कुठून आले, कोणाला मिळाले अशा प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. कोणतीही व्यवस्था सुरुवातीच्या टप्प्यात परिपूर्ण नसते. परंतु, त्यातील त्रुटी दूर करता येतात आणि त्यानंतर ती व्यवस्था परिपूर्ण करता येते.”
ईडीबाबत विचारलेल्या प्रश्नावर काय म्हणाले मोदी ? PM Modi on Electoral Bond|
पंतप्रधानांना ईडीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, “आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर ईडीची निर्मिती झाली का? पीएमएलएचा कायदा आम्ही केला आहे. ईडी स्वतंत्र आहे, आम्ही ते थांबवत नाही आणि पाठवत नाही. त्यांना स्वतंत्रपणे काम करावे लागेल. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. ईडीकडे 7000 प्रकरणे आहेत आणि 3 टक्क्यांहून कमी प्रकरणे राजकारणाशी संबंधित आहेत.”
“त्यांच्याकडून 35 लाख रुपये, 2200 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. काही ठिकाणी पैसे वॉशिंग मशिनमध्ये तर काही ठिकाणी पाईपमध्ये पैसे ठेवले जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेस खासदाराकडून 300 कोटी रुपये जप्त, बंगालमध्ये मंत्र्यांच्या घरी नोटांचा ढीग सापडला आहे. इतर एजन्सीने गुन्हा नोंदविल्याशिवाय ईडी कारवाई करत नाही,” असे स्पष्टपणे मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा:
सुप्रिया सुळेंचा व्हाट्सअप स्टेटसद्वारे विरोधकांना इशारा ; शरद पवारांचा ‘तो’ फोटो स्टेटसवर