नवीदिल्ली – भारताच्या विकासात टाटा समूहाने दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उद्योग समूहाचे तोंडभरून कौतुक केले आहे. असोचाम या भारतीय उद्योजकांच्या संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उद्योगपती रतन टाटा यांना असोचाम एन्टरप्राईज ऑफ द सेंच्युरी पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. भारतीय उद्योजकांच्या या संघटनेने गेल्या शंभर वर्षाच्या काळात अनेक प्रकारचे चढउतार पाहिले. पण या सर्व काळात त्यांनी भारताच्या विकासात मोलाची भरच घातली आहे त्यात टाटा समूहाचे कार्यही कौतुकास्पद राहिले आहे असे मोदींनी यावेळी नमूद केले.
सत्त्काराला उत्तर देताना रतन टाटा यांनीही मोदींच्या नेतृत्वाचा गौरव केला. ते म्हणाले की, मोदींनी देशहितासाठी त्यांना योग्य वाटले ते निर्णय घेतले आणि पूर्ण करून दाखवले. लॉकडाऊनचा निर्णय असेल, काही मिनिटांसाठी दिवे घालवायचे आवाहन असेल असे सारे निर्णय मोदींनी यशस्वी करून दाखवले.
हा केवळ दिखाऊपणा नव्हता त्यातून देशात एकोप्याची भावना निर्माण झाली. आता उद्योग जगताने देशाच्यासाठी काही तरी करून दाखवण्याचा काळ आला असून आम्ही ते करून दाखवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अडचणीच्या काळात देशाचे नेतृत्व यशस्वीपणे केल्याबद्दल रतन टाटा यांनी मोदींचे आभार मानले.