नवी दिल्ली – संसदेची सुरक्षा भेदली गेल्याच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅबिनेट मंत्र्यांना विशेष निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात विनाकारण केल्या जाणाऱ्या राजकारणात न पडता ही बाब गांभीर्याने घ्यावी आणि आपल्याला सगळ्यांनाच सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे मोदींनी मंत्र्यांना सांगितले आहे.
काल झालेल्या या घटनेमुळे देशभर एकच गदारोळ माजला आहे. दोन जणांनी सुरक्षा कवच भेदून चक्क संसदेच्या प्रेक्षा गॅलरीतून सभागृहात उडी घेतल्याचा प्रकार समोर आल्यामुळे सगळेच अवाक झाले आहेत. अशा प्रकारे दहशतवाद्यांनी सुरक्षा भेदली असती तर काय गंभीर स्थिती निर्माण झाली असती याची कोणीही कल्पना करू शकत नाही.
स्वभाविकच विरोधी पक्षांनी आज आक्रमकपणे हा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उत्तराची मागणी केली आहे. स्वत: शहा अथवा मोदी यांनी आतापर्यंत काहीही विधान केलेले नाही, मात्र सरकारने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. या संदर्भात चौकशी सुरू झाली असून काही जणांवर कठोर कारवाईही करण्यात आली आहे. आता मोदींनी आपल्याच मंत्र्यांना राजकारण न करता गांभीर्याने या विषयाची दखल घेण्याची सूचना केल्यामुळे सगळ्यांनीच अगदी विरोधकांनीही यावर अधिक जबाबदारीने वर्तन करणे अपेक्षित आहे.