नवी दिल्ली – सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांची आणि सरकारची उपलब्धता मांडत निवडणुकीचे बिगुल फुंकले.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपण आत्मविश्वासाने सज्ज असून जीवनातील आव्हाने आपल्याला आनंद देतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्याला विकासाची कामे पुढे न्यावी लागतील. निवडणूक आता फार दूर नाही. लोकशाहीचा हा एक अत्यावश्यक पैलू आहे आणि आपण सर्वजणांनी त्याचा अभिमानाने स्वीकार करायला पाहिजे.
आपली लोकशाही साऱ्या जगाला आश्चर्यचकित करत आहे आणि अशीच आश्चर्यचकित करीत राहील, याची मला खात्री आहे. ईश्वराने मला असा काही आशिर्वाद दिला आहे की जेव्हा माझ्यावर संकटे येतात तेव्हा माझी कामगिरी आणखी चमकून दिसू लागते.
मोदी म्हणाले की, राम मंदिराबाबत आज सभागृहाने मंजूर केलेला ठराव येत्या पिढीला या देशाच्या मूल्यांचा अभिमान बाळगण्याची घटनात्मक शक्ती देत आहे. या गोष्टींचा अभिमान वाटण्याची क्षमता प्रत्येकामध्ये नसते हे खरे आहे.
पण तरीही, या सभागृहात भविष्यासंदर्भात झालेल्या चर्चेत संवेदनशीलता, संकल्प आणि सहानुभूती या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे. खासदारांनी जे सांगितले त्यात सबका साथ, सबका विकास हा मंत्र पुढे नेण्याचाही एक घटक आहे.
राम मंदिराचा प्रस्ताव महत्त्वाचा
२१व्या शतकात आपल्या मूलभूत गरजा बदलत आहेत. ज्या गोष्टींकडे आपण लक्ष दिले नाही ते आता अनमोल झाले आहेत. डेटा सारखा… ज्याची जगात चर्चा आहे. एक विधेयक आणून सरकारने संपूर्ण भावी पिढीला सुरक्षित केले आहे.
निवडणुका आल्या की काही लोक घाबरायला लागतात. राम मंदिराचा प्रस्ताव महत्त्वाचा आहे. देशाच्या भावी पिढीसाठी आपण नेहमीच काहीतरी चांगले करत राहू, असे पंतप्रधान म्हणाले.
हे सदन आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. सामूहिक संकल्प आणि सामूहिक शक्तीने आम्ही सर्वोत्तम कार्य करू. भारताच्या भावी पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही काम करत राहू.