PM Narendra Modi| गेल्या दहा वर्षांत भाजपने समस्त भारतीयांच्या कल्याण आणि हितरक्षणाची जी कामे केली आहेत, ती पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप एकट्याच्या बळावर ३७० जागांचा टप्पा पार करेल. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह ४०० धावांचा टप्पा सहज पार होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी दुसरा दिवस होता. त्यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. भाजपच्या राजकारणाची गेली दहा वर्षे धाडसी निर्णयांची आणि दूरगामी परिणामांची वर्षे आहेत. शतकानुशतके प्रलंबित असलेली अनेक कामे आता पूर्ण झाली आहेत. किमान ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिर बांधण्यात आले.
सात दशकांच्या प्रतीक्षेनंतर देशाला कलम ३७० मधून स्वातंत्र्य मिळाले. चार दशकांनंतर आपल्याला वन रँक वन पेन्शनची भेट मिळाली आहे. तीन दशकांनंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळाले आहे. अनेक दशकांपासून संसदेच्या नव्या इमारतीची गरज होती आणि ती आम्ही पूर्ण केली. यासाठी प्रसंगी विरोध पत्करुन आम्ही अनेक धाडसी निर्णय घेतले, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मोदी म्हणाले की, आता इतके काम केल्यानंतर आगामी १०० दिवसांत आपल्याला न भूतो न भविष्यती असे काम करायचे आहे. देशाच्या सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक वर्गापर्यंत, प्रत्येक परंपरापर्यंत पोहोचावे लागते. आपण सर्वांचा विश्वास संपादन केला पाहिजे. हा सर्वांचा एकत्रित प्रयत्न असेल तरच भाजपला जास्तीत जास्त जागा मिळून देशसेवेची पुन्हा संधी मिळेल.
मिशन शक्ती देशात महिला सक्षमीकरणाचे वातावरण निर्माण करेल. पारंपारिक कलांशी संबंधित भगिनींना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सक्षम केले जाईल. गावाजवळ खेळाच्या चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर मुली खेळात चमत्कार घडवतील. हे जरी खरे असले, तरी कोणीही काहीही गृहित न धरता पूर्णपणे आत्मसमर्पण करुन झपाटल्यासारखे काम करायला हवे आहे, असेही मोदी म्हणाले.
“मी स्वत:च्या आनंदासाठी आणि वैभवासाठी जगणारी व्यक्ती नाही. मी भाजप सरकारची तिसरी टर्म सत्ता उपभोगण्यासाठी मागत नाही. मला फक्त माझ्या घराची काळजी असती तर आज करोडो गरीब लोकांसाठी मी घरे बांधू शकलो नसतो. करोडो मुलांच्या भवितव्यासाठी मी जगतो. कोट्यवधी भारतीयांचे जीवन बदलण्यासाठी देशासाठी आपल्याला अजून खूप काही साध्य करायचे आहे. अजूनही अनेक निर्णय बाकी आहेत. आज भाजप युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब आणि शेतकऱ्यांची शक्ती हीच विकसित भारत घडवण्याची शक्ती आहे.” – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
१. आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर राष्ट्रीय धोरण करण्यासाठी आलो आहोत
२. योजना कशा पूर्ण करायच्या हे विरोधी पक्षांना माहीत नसेल, पण खोटी आश्वासने देण्यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही
३. विकसित भारताचे स्वप्न केवळ भाजप आणि एनडीए आघाडीने पाहिले आहे
४. आमची स्वप्नंही मोठी असतील आणि संकल्पही मोठे असतील
५. दांडी येथे मिठाच्या सत्याग्रहाचे आधुनिक स्मारक आम्ही बांधले
६. बाबासाहेब आंबेडकरांची पंचतीर्थे आम्हीच विकसित केली
७. सरदार पटेलांचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आमच्या सरकारने बांधला
८. २६ डिसेंबर हा संविधान दिन म्हणून आम्हीच घोषित केला