“तो मी नव्हेच’ या नाटकामुळे सर्व नाट्यसृष्टीला ओळख असणारे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म मुंबईतील फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न कुटुंबात 14 मार्च 1931 रोजी झाला.
प्रभाकरपंतांचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असल्यापासूनच त्यांना नाटकाचे वेड होते. लहान वयातच प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. ती नाटके त्यांनी पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे जुन्या वळणाच्या घरातून त्यांना बाहेर पडावे लागले. सुरुवातीला चरितार्थासाठी “नाट्यनिकेतन’ या मो. ग. रांगणेकर यांच्या संस्थेत त्यांनी पडेल ते काम केले. एखाद्या कलाकाराच्या गैरहजेरीत त्यांनी छोट्या भूमिका पार पाडल्या. मात्र “राणीचा बाग’, “कुलवधू’ यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्यावर मात्र पणशीकर नाट्यनिकेतन व नाटकात स्थिरावले. “राणीचा बाग’ या नाटकाद्वारे 13 मार्च 1955 रोजी पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यांनी 50 वर्षांच्या कारकिर्दीत मराठीसोबतच गुजराथी व कन्नड भाषेतही नाटकांचे सुमारे 8 हजारांच्या वर प्रयोग केले. त्यांनी 4 मराठी चित्रपट, 4 मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिकापण केली तसेच आकाशवाणीसाठी असंख्य नाट्यवाचने केली.
रांगणेकरांच्या “नाट्यनिकेतन’ कंपनीने वर्ष 1962 साली आचार्य अत्रे यांचे “तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा अत्र्यांनी लखोबाच्या भूमिकेसाठी पणशीकरांना नाकारले होते, असे म्हणतात. पण ठरल्याप्रमाणे 15 ऑगस्ट 1962 रोजी “तो मी नव्हेच’चा दिल्लीत पहिला प्रयोग झाला. या नाटकात पणशीकरांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या पंचरंगी व्यक्तिरेखा वठविल्या.
पुढे रांगणेकरांशी मतभेद झाल्यामुळे ते “नाट्यनिकेतन’मधून बाहेर पडले आणि “अत्रे थिएटर्स’मधून “तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करू लागले. कालांतराने आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या मदतीने त्यांनी 1963 मध्ये “नाट्यसंपदा’ या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीस “अमृत झाले जहराचे’, “मोहिनी’ अशी दोन नाटके “नाट्यसंपदे’ने रंगमंचावर आणली. मात्र, ती फारशी चालली नाहीत. त्यानंतर “मला काही सांगायचंय’ आणि विशेषतः “इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांमुळे “नाट्यसंपदे’ला स्थैर्य, अर्थप्राप्ती, यश आणि प्रसिद्धी मिळाली. वर्ष 1970 मध्ये “तो मी नव्हेच’चे हक्क “नाट्यसंपदे’ने विकत घेऊन पुढे या नाटकाचे त्यांनी 2 हजारांहून अधिक प्रयोग केले, तसेच “अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचे तब्बल 1,111 प्रयोग केले आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी सकाळी, दुपारी आणि रात्री “नाट्यसंपदा’ने त्यांची “अश्रूंची झाली फुले’, “कट्यार काळजात घुसली’ आणि “संत तुकाराम’ ही तीन नाटके तीन नाट्यगृहांत सादर करून विक्रम प्रस्थापित केला.
त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, जागतिक मराठी परिषद पुरस्कारासह सुमारे 20 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 13 जानेवारी 2011 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.