चित्रपट क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ असा ऑस्कर पुरस्कार “आरआरआर’ या भारतीय चित्रपटातील “नाटू नाटू’ या गाण्याला मिळाला आहे. हा आपल्यासाठी आनंदाचाच क्षण आहे. कारण यामुळे एकप्रकारे भारताचाही गौरव केला गेला आहे.
चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ऑस्कर पुरस्काराला सर्वोच्च स्थान आहे. ज्या कलाकृतीला अथवा कलावंताला ऑस्कर मिळाले त्याची प्रतिष्ठा शिखरावर पोहोचते. त्याची कारकीर्द वाढते. अर्थात, गेल्या काही काळात ऑस्करच्या श्रेष्ठत्वाबाबत वेगळी मतेही मांडली गेली. ऑस्कर म्हणजे सर्वस्व नाही. ऑस्करची मोहोर उमटली नाही तर आपण दुय्यम ठरत नाही, हा त्यामागचा सार. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचे तसे म्हणणे आहे. ते खोटे ठरवता येणार नाही. कारण, आपल्याकडच्या कलाकृतींना न्याय देणारे अनेक पुरस्कार आपल्याकडे दिले जातात. राष्ट्रीय पुरस्कारही आहेत. असे असले तरी ऑस्करला असलेले ग्लॅमर वेगळे आहे. ऑस्कर मिळाले की जगभरात मान्यता मिळते, असा रिवाज आहे. त्या दृष्टीने ऑस्कर महत्त्वाचेच. त्यामुळेच आजचा सोमवार भारतीयांसाठी अत्यंत खास ठरला. भारताने आज एकाच दिवशी दोन ऑस्कर पटकावले. हे यश अभूतपूर्व आहे. त्याचा आनंद साजरा केलाच पाहिजे. विशेष म्हणजे भारतीय कलाकृतींची, भारतीय संगीताची, नृत्याची दखल घेतली जाते आहे म्हणूनही याकडे पाहिले पाहिजे.
भारतातील बहुतेक भागांत हिंदी चित्रपट प्रदर्शित होतात. त्यांची संख्या शेकड्याने आहे. त्याशिवाय अन्य प्रादेशिक भाषाही आहेत. त्यातही मोठ्या प्रमाणात चित्रपटांची निर्मिती केली जाते. त्या त्या भाषेच्या चित्रपटसृष्टीचे पुरस्कार असतात आणि ते दरवर्षी प्रदानही केले जातात. पण ऑस्कर हा एक असा पुरस्कार आहे जेथे जगभरातील उत्तमोत्तम कलाकृतींशी तुम्हाला स्पर्धा करावी लागते. त्यानंतर तुम्हाला जे यश मिळते त्याचा आनंद अवर्णनीयच असतो. भारताला पुन्हा काही वर्षांच्या खंडानंतर या आनंदाचे साक्षीदार होता आले आहे. “आरआरआर’ या प्रचंड गाजलेल्या चित्रपटातील “नाटू नाटू’ गाण्याने ऑस्करवर नाव कोरले आहे. संगीतकार किरावानी आणि गीतकार चंद्राबोस हे मोजक्या ऑस्कर विजेत्यांच्या यादीत स्थानापन्न झाले आहेत. त्याचसोबत “द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीनेही ऑस्कर पटकावले आहे. ऑस्करच्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी यंदा भारताकडून तीन नामांकने पाठवण्यात आली होती. त्यातील दोन ऑस्कर आपल्याला मिळाले हे लक्षणीय यश म्हणता येते.
भारतीय कलावंतांना किंवा कलाकृतीला यापूर्वी ऑस्कर मिळालेच नाही असे नाही.मात्र, ते यश अगदी बोटावर मोजण्याइतके. ज्याप्रकारे जागतिक स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपली कामगिरी असते तशीच ऑस्करमध्येही. बऱ्याचदा, किंबहुना बहुतेक वेळा आपण रित्या हातानेच परततो. अशा वेळी कोणी ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले त्यावेळी जसा आनंद होतो तेवढाच किंवा त्यापेक्षाही अधिक आनंद ऑस्कर मिळाल्यामुळे मानायला हरकत नाही. आरआरआरच्या नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंग या श्रेणीत ऑस्कर मिळाले आहे. यास्तव त्याचे महत्त्व अधिक वाढते. भारतीय चित्रपटांवर विशेषत: हिंदी चित्रपटांवर उचलेगिरीचा आरोप सातत्याने केला जातो. काही कथा अन्य देशांतील चित्रपटांच्या कथांवरून प्रेरित असतात. तथापि, ज्यांचे वाचन अथवा चित्रपटातील स्वारस्य अधिक असते त्यांच्या ही बाब लक्षात येते. काही चित्रपटांचा रिमेकच केला जातो. त्याकरता रितसर कॉपीराइट घेतले जातात. त्यामुळे संबंधित कथेचे भारतीयीकरण करणे एवढेच काय ते कौशल्य दाखवावे लागते. काही निर्माते दिग्दर्शक मात्र निर्लज्जपणे “फ्रेम टू फ्रेम’ कॉपी करतात आणि आपली कलाकृती म्हणून ती सादर करतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. गमतीचा भाग म्हणजे कॉपी केलेल्या अथवा स्टोरी आयडिया ढापलेल्या या कलाकृतीही मूळ कलाकृतीएवढ्याच किंवा काहीवेळा त्यापेक्षाही जास्त यशस्वी ठरतात. जे चित्रपटांचे तेच गाण्यांचे आणि संगीताचे. बरीच गाणी किंवा त्यांची चाल किंवा सादरीकरणातील नृत्यशैली यावर असा चोरीचा आरोप होत असतो. ही बाब भूषणावह नसते. असे आरोप सातत्याने झाले की इतर सचोटीने काम करणारे, क्रिएटीव्हीटी दाखवणारेही संशयाच्या फेऱ्यात सापडतात. एकप्रकारे त्यांच्यावर अन्यायच होतो. या पार्श्वभूमीवर “नाटू नाटू’चे यश मोलाचे ठरते.
यापूर्वी स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील “जय हो’ या गाण्याला ऑस्कर मिळाले होते. “स्लमडॉग’ हा भारतीय चित्रपट म्हणावा का, हा वादाचा विषय. तथापि, “जय हो’ या गाण्याच्या माध्यमातून भारताला ऑस्करचा आनंद मिळवून देणारा ए. आर. रहमान मात्र अस्सल भारतीय. आपल्याच मातीतील कलाकार. एखाद्या गाण्यासाठी भारताला ऑस्कर मिळवून देण्याची ती पहिलीच वेळ. याच गाण्यासाठी रेसुल पुकुट्टी यांना साउंड डिझाइनिंग आणि साउंड एडिटिंगसाठी तर गुलजार यांना शब्दरचनेसाठी हा पुरस्कार मिळाला. त्याच्याही अगोदर रिचर्ड ऍटनबरो यांच्या “गांधी’ चित्रपटाचा भारताच्या संदर्भात बराच बोलबाला झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या एका महानायकावरचा हा चित्रपट. तोही एका विदेशी माणसाने केला. त्यातील कलाकार भारतीय, चित्रपटाचा आत्माही भारतीय आणि त्याचे संगीतही भारतीय. जगाने त्याची दखल घेतली. यातील कॉस्ट्यूम डिझाइन अर्थात वेशभूषेसाठी भानू अथैय्या यांनी तेव्हा ऑस्कर पटकावले होते. ते पहिले यश.
कलाकारांना सीमांचे बंधन नसते. त्यांच्याकडे राष्ट्राच्या चष्म्यातून पाहता येत नाही. त्यांच्या झेंड्याचा रंग पाहून त्यांच्यावर प्रेम करता येत नाही. त्यांची कला ही त्यांच्या रसिकांची असते. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या किंवा त्या कलाकृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा त्यावर आणि त्या कलाकारावर तेवढाच हक्क असतो. ऑस्कर पुरस्कार तुम्हाला तुमच्या सीमेपलीकडच्या चाहत्यांची ओळख करून देतो आणि त्यांच्याशी जोडण्याची संधी देतो. अनेक भारतीय चित्रपट व अन्य कलाकृती दरवर्षी ऑस्करची वारी करतात. सगळ्याच चांगल्या असतात असे नाही, मात्र टाकाऊही नसतात. मुळात ऑस्करला जाण्याचे स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगले असते. असंख्य जणांनी ते पाहिले, पण पदरी निराशाच पडली. नर्गिसजी यांच्या “मदर इंडिया’पासून आशूतोष गोवारिकर यांच्या “लगान’पर्यंत ही भलीमोठी यादी आहे. अनेक चांगले चित्रपट आपण केले. भारतीय प्रेक्षकांनी त्यांना आपल्या हृदयात मानाचे स्थान दिले. ऑस्करच्या स्पर्धेत त्यांच्या हाती निराशाच आली. चित्रपट अथवा गाणी ही त्या त्या देशाच्या संस्कृतीची प्रतीके असतात. आपल्या माध्यमातून ते आपला देश जगासमोर मांडत असतात.
इतक्या वर्षांत भारतीय ऑस्करमध्ये कमी पडले असतील. म्हणून त्यांचा दर्जा कमी होत नाही. आता आपण आपल्या उणिवा जसजशा दूर करत जातोय तसे यश आपल्या दृष्टिपथात येऊ लागले आहे. ऑस्करच्या संदर्भात आपल्याला सातत्य राखता आले तर भारतीय कलाकारांकडे (केवळ नायक/नायिका नाहीत) आदराने पाहिले जाऊ शकते. सोपस्काराचा भाग न मानता त्यांना काय म्हणायचे आहे या दृष्टीने त्यांच्याकडे लक्ष दिले जाऊ शकते. तसे जर झाले तर आपल्याकडचे उत्तमोत्तम साहित्य, संगीत आणि कलावंत दुर्लक्षित राहणार नाहीत.