चिंबळी -करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असून संचारबंदी लागू आहे. तर बाहेर पडल्यावर करोनाची भीती यामुळे 90 टक्के नागरिक घरात बसून आहेत. मात्र, घरात बसून टीव्ही, मोबाइल, पुस्तके वाचून कंटाळलेल्या आबालवृद्धांसह तरुणांनी घरातच बैठे खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे. तर, खेळाडू आणि व्यायामप्रेमी नागरिक घरातच व्यायाम, कसरती सुरू ठेवण्यावर भर देत आहेत.
लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने नागरिकांनी घरबसल्या मार्ग काढला आहे. पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, लुडो यासारखे घरगुती बैठे खेळ रंगू लागले आहेत. त्याचबरोबर, योगासने, सूर्य नमस्कार, दोरीच्या उड्या आदी कसरतींवर भर दिला जात आहे. 24 तास घरात बसण्याची वेळ आजपर्यंत कधीच आली नसेल.
त्यामुळे या वेळेत घरात लहानथोरांसह सर्वजण काहीना काही खेळ खेळत आहेत. त्यात सापसिडी, खडे, गोट्या, पत्ते, चित्रकला, भांडीकुंडी असे विविध खेळ घराघरांमध्ये खेळले जात आहेत. तर ज्या घरात आजी-आजोबा आहेत ते आपल्या जीवनातील प्रसंग, विविध गोष्टी, रामायण, महाभारतातील प्रसंग नातवांना सांगत आहेत. त्यामुळे लहान मुले घरातच बसून राहत असल्याने त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास याचा उपयोग होत आहे.
आई, बाबा, आजी-आजोबांचा मिळतोय सहवास
लॉकडाऊन असल्यामुळे पालक मुलांसमवेत वेळ घालवताना दिसत आहेत. त्यांच्या जोडीला बऱ्याच घरांमध्ये आजी-अजोबा आहेत. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद अनुभवण्यास मिळत आहे. सर्व एकत्र आल्याने घरातील मोठी माणसे आपल्या मुलांना घरातील कामे कशी केली जातात. भाज्या कशा निवडल्या जातात. चपाती, भाकरी कशी केली जाते, याचे प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे पालकांसह मुलांचादेखील वेळ जात आहे. त्यामुळे सतत त्रास देणारी, बाहेर फिरण्यासाठी घेऊन चला म्हणणारी मुले आता घरात रमू लागली आहेत.