पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील पूल तसाच ठेवला असता, तर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे खांबदेखील रस्त्याकडेला आले असते. त्यामुळे तेथे खांबांचे जाळे निर्माण झाले असते. त्यातून आणखी वाहतूक कोंडी झाली असती. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेतला. तो घेताना प्रशासन, वाहतूक पोलीस, मुंबई आयआयटी, लोकप्रतिनिधी अशा सर्वांना विश्वास घेतले. नागपूरमध्ये ज्याप्रमाणे एकाच पुलावरून मेट्रो आणि इतर वाहनांची वाहतूक होते. तसेच नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून हे निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भविष्यात पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीवर “प्रभात’मध्ये बुधवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत पवार यांनी “या चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चांगले नियोजन करा. गर्दी कशी टाळता येईल, यासाठी योग्य ती कार्यवाही करा,’ अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
पवार म्हणाले, “विद्यापीठ चौकात 2006 मध्ये उड्डाणपूल उभारण्यात आला. त्यामध्ये त्रुटी होत्या. त्यावेळी या मार्गावर मेट्रोचे नियोजन नव्हते. वाढती वाहतुकीची कोंडी दूर करण्याचा विचार करत असताना, तिथून मेट्रोचा उड्डाणपूल तिथून जात असताना पूर्वीच्या उड्डाणपुलाचे खांब आणि मेट्रो जात होती. त्यामुळे या चौकात खांबाची गर्दी होत होती. आता आधुनिक तंत्रज्ञानदेखील आले आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर गर्दी नव्हती, या सर्व गोष्टींचा विचार करून तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.’ सध्या या चौकात सकाळच्या आणि सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी असते. विद्यापीठ चौक हा गर्दीचा चौक आहे. तेथून औंध, बाणेर, पाषाण, सेनापती बापट मार्ग असे सर्व रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथे एकच खांब असेल. मेट्रोच्याच खांबावर उड्डाणपूल आणि त्याच खांबावरून मेट्रो धावणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
जनतेनेही सूचना कराव्यात
मेट्रो प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. सर्व प्रकराच्या मान्यता मिळाल्या आहेत. उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम सुरू झाल्यावर त्या परिसरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियोजन आराखडाही तयार झाला आहे. परंतु, अद्याप काही मान्यता प्रलंबित आहेत. त्यादेखील अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी अथवा दिवाळीनंतर या उड्डाणपुलाच्या कामास सुरूवात होईल. हे काम वेळेत पूर्ण होईल, यावरही आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. या संदर्भात कोणाला काही सूचना कराव्याच्या असतील, तर आम्हाला कळवा, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
असे असेल नियोजन
अभिमान श्री चौकात ग्रेडसेपरेटर, गणेशखिंड चौकात दोन लेनचा ग्रेड सेपरेटर, सिमला ऑफिस चौक, संचेती चौकात जाण्यासाठी दोन लेनचा ग्रेड सेपरेटर करणार आहोत. याबाबतचे सादरीकरण झाले आहे. तज्ज्ञांशीही चर्चा केली आहे. वाहतूक आराखडे मंजूर केल्याचे पवार यांनी सांगितले.