वंदना बर्वे
राजकीय विश्लेषकांनुसार, सोनियांनी पुन्हा एकदा आपला राजकीय पराक्रम दाखवला आहे आणि पक्षावरचे नियंत्रणही स्पष्टपणे जाणवून दिले आहे.
ही बाब सर्वविदित आहे की, सोनिया गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्षा असल्या तरी मागील दशकभरापासून पक्षाचे बहुतांश निर्णय राहुल गांधी यांच्याकडूनच घेतले जात आहेत. यापुढेही त्यांच्याकडूनच घेतले जातील. जरी, सोनिया गांधी यांनी मीच पूर्णवेळ अध्यक्ष आहे असे म्हटले असले तरी किंबहुना, राहुल गांधीकडून आणखी ठसक्यात निर्णय घेतले जातील. मात्र, या घडामोडीची दुसरी बाजू पाहणेसुद्धा गरजेची आहे.
कारण सोनिया गांधी अधिकृतपणे कॉंग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्षा होणार नाहीत. कॉंग्रेसच्या घटनेनुसार, कॉंग्रेसचा अध्यक्ष हा निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून निवडला जाणे गरजेचे आहे किंवा कार्यसमिती आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून नेत्याची निवड अध्यक्ष म्हणून करू शकते. याची सूचना निवडणूक आयोगाला देणे गरजेचे आहे. ही सर्व कायदेशीर प्रक्रिया अंमलात आणली जात नाही तोपर्यंत अध्यक्षाला कायदेशीर दर्जा प्राप्त होत नाही.
कार्यसमितीने ठरविल्यानुसार कॉंग्रेसच्या पुढील अध्यक्षाची निवड 2022 च्या नोव्हेबरमध्ये होणार आहे. राहुल गांधी यांची 2017 मध्ये अध्यक्षपदी निवड झाली होती. यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिला नसता तर राहुल गांधी 2022 पर्यंत अध्यक्षपदी राहिले असते.
आता निवडणुकीचा कार्यक्रम वर्षभर चालणार आहे. 2022 हे वर्ष डोळ्यासमोर ठेवूनच कदाचित राहुल गांधी यांच्या सल्लागारांनी ही बाब लक्षात घेऊन हा कार्यक्रम आखला की काय? असा प्रश्न निर्माण होतो.
दरम्यान, जी-23 गटातील नेत्यांचा सूर बदलला असल्याची चर्चा आहे. पक्ष संघटनेच्या निवडणुका घेऊ नये अशी सूचना या नेत्यांनी केली आहे. याच नेत्यांनी निवडणुकीची मागणी केली होती. राहुल गांधी यांचा दीड-दोन वर्षांचा कार्यकाळ सोडला तर सोनिया गांधी याच अध्यक्षपद सांभाळत आहेत. सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचं अध्यक्षपद 19 वर्षांपर्यंत साभाळलं आहे. 2004 ते 2017 पर्यंत त्या पक्षाध्यक्ष होत्या.
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्या हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाचे नेतृत्व करत आहेत. सोनिया गांधी 1998 मध्ये पहिल्यांदा कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या होत्या. एक प्रकारे, त्यांनी जी -23 नेत्यांना आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांनी हे विसरू नये की त्यांच्या नेतृत्वाखाली, यूपीएच्या सत्तेच्या 10 वर्षांच्या काळात पक्षाने त्यांना मंत्रिपद दिले होते.
पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका पाहता नवीन अध्यक्षांच्या निवडीला थोडा वेळ लागू शकतो, परंतु राहुल गांधी यांच्यावर ही जबाबदारी दिली जाईल कारण सोनिया गांधी आरोग्याच्या कारणामुळे ही जबाबदारी पार पाडू शकत नाहीत. लवकरच किंवा नंतर फक्त राहुल गांधी ही जबाबदारी सांभाळतील यात शंका नाही. आगामी विधानसभा निवडणुका सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील पण राहुल-प्रियांका निर्णय घेत राहतील.
सोनिया गांधींच्या या वक्तव्यानंतर जी-23 गटाचे नेते उलटसुलट विधानं करणार नाहीत अशी चर्चा आहे. ते निवडणुकीपर्यंत गप्प राहतील. पण पुढच्या वर्षी यूपी, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष कशी कामगिरी करतो यावर त्यांचे मौन अवलंबून आहे. यूपी वगळता इतर राज्यांमध्ये पक्षाने चांगली कामगिरी केली नाही तर पुन्हा वादळ उठेल.
कॉंग्रेस पाचही राज्यांच्या निवडणुका हरली तर निश्चितपणे जी-23 गट गांधी कुटुंबाला गोत्यात आणू शकते, परंतु जर पक्षाने उत्तराखंड आणि पंजाबमधील निवडणुका जिंकल्या तर गांधी कुटुंबाची कॉंग्रेसवरील पकड मजबूत होईल.
जी-23 मधील काही नेत्यांना वगळलं तर त्यातील बहुतेकांना राज्यसभेचे खासदार व्हायचे आहे. उल्लेख करायचाच झाला तर गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल या नेत्यांचा करावा लागेल. कार्यसमितीच्या बैठकीपूर्वी या नेत्यांचा बंडखोरीपणा थोडा शांत झाला असे म्हणायला हरकत नाही. कारण, उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना अटक केली होती.
या घटनेचा गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी तीव्र विरोध दर्शविला. एवढेच नव्हे तर, लखीमपूर घटनेविरुद्ध राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटायला जाताना मार्च काढण्यात आला. ही मंडळी त्यातही सहभागी झाली. यामुळे हे नेते आता शांत झाले असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आपण कॉंग्रेसचे शुभचिंतक आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न सुद्धा जी-23 गटाकडून केला जात आहे. अलीकडेच कपिल सिब्बल यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेऊन पक्षाची धुरा आपल्या हाती घेण्याची विनंती केली. यावर प्रियंका गांधी सिब्बल यांना म्हणाल्या की, “तुम्हीच का नाही कॉंग्रेसची धुरा आपल्या हाती घेत. आपल्याला एवढ्या वर्षांचा अनुभव सुद्धा आहे’.
यावरून स्पष्ट संदेश आहे की, जी-23 गटाने राहुल गांधी यांना बायपास करण्यासाठी गांधी कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाही त्यातून काहीही मिळणार नाही. या गटातील मनीष तिवारी आणि भूपिंदरसिंह हुडा यांना सोडलं तर उर्वरित नेत्यांमध्ये एकही असा नाही जो निवडणुकीला सामोरं जाण्याची हिंमत करेल.
पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे, परंतु कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी या प्रस्तावावर विचार करण्याचा शब्द दिला आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, अशी कॉंग्रेस नेत्यांची अनेक दिवसांपासून मागणी आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला, त्यावर सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली. अलीकडेच, पक्षाचे वरिष्ठ नेते पीएल पुनिया आणि सलमान खुर्शीद यांनी मागणी केली होती की निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवावे जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.
तसं बघितलं तर, नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय इतर कोणालाही अध्यक्ष बनवण्याचा पर्याय कॉंग्रेसला दिसत नाही. याचे कारण असे की जेव्हा या कुटुंबातून सीताराम केसरी आणि नरसिंह राव यांना पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले, तेव्हा त्यांचा अनुभव चांगला नव्हता, त्यामुळे लोकांना वाटते की नेहरू-गांधी कुटुंबातील कोणीतरी अध्यक्ष व्हावे, म्हणून राहुल गांधी हे एकमेव उमेदवार आहेत, यात शंका नाही.