स्वप्निल श्रोत्री
तिसरे महायुद्ध कोणालाही परवडण्यासारखे नाही; त्यामुळे माध्यमांनी तिसऱ्या महायुद्धाच्या तारखा ठरविण्यापेक्षा जगात शांतता कशी प्रस्थापित होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सत्ताकारण हा जागतिक राजकारणाचा पाया आहे. अगदी महाभारताच्या काळापासून ते आजच्या काळापर्यंत जागतिक राजकारण ज्या प्रमुख मुद्द्यांभोवती फिरले त्यांपैकी सत्ताकारण हे एक होय. सर्वप्रथम आपल्या प्रदेशाची किंवा आपल्या राज्याची सत्ता हस्तगत करणे; त्यानंतर आजूबाजूच्या प्रदेशाची सत्ता मिळवणे. सर्वात शेवटी जगज्जेता होण्यासाठी प्रयत्न करणे ही साधारण मानसिकता सत्ताधाऱ्यांची होती किंवा आजही आहे.
कोणत्याही राष्ट्राचा किंवा साम्राज्याचा विस्तार हा शांततेची प्रवचने झोडून झाल्याचे इतिहासात एकही उदाहरण नाही. रोमन साम्राज्यापासून ते बलाढ्य मगध साम्राज्यापर्यंत आणि ऑटोमन साम्राज्यापासून ते आजच्या अमेरिकेपर्यंत जगात जी काही ज्ञात साम्राज्ये आहेत ती बळाच्या जोरावरच मोठी झाली आहेत. जी साम्राज्ये बलवान नव्हती ती इतर बलवान राष्ट्रांकडून धुळीला मिळविली गेली; अर्थात सत्ताकारणाचा मार्ग हा युद्धाच्या दरवाजातून जातो.
ऐतिहासिक काळातील जागतिक राजकारणाला जे नियम लागू होते त्यापैकी बरेच नियम हे आजही जागतिक राजकारणाला लागू आहेत. आज अमेरिकेला जग महासत्ता म्हणून ओळखते ते केवळ अमेरिकेकडे भरपूर पैसा आहे म्हणून नव्हे तर मागील दोन जागतिक युद्धात अमेरिकेने जी निर्णायक भूमिका बजावली आहे त्यामुळे हा महासत्तेचा मुकुट आज अमेरिकेच्या डोक्यावर आहे. युद्ध, महायुद्ध, अण्वस्त्रे हे लोकांच्या विशेष कुतुहलाचे विषय आहेत.
त्यामुळे आजही युद्ध आणि युद्धासंबंधित गोष्टी या आवडीने चघळल्या जातात. जागतिक राजकारण आज अशक्यतांनी भरले आहे. पाकिस्तान, चीनसारखी राष्ट्रे दिवसेंदिवस आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतर देशांच्या सागरी व लष्करी हद्दीत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढले आहेत. काही आक्रमक राष्ट्रांच्या विस्तारवादी भूमिकेमुळे जागतिक शांतता धोक्यात आली आहे.
अशावेळी समाजाला सावरण्याचे सोडून केवळ आपापसातील स्पर्धेमुळे काही इलेक्ट्रॉनिक माध्यमे सदर जागतिक घडामोडींचा गैरफायदा घेताना दिसतात. जगात जरा काही झाले की, तिसरे महायुद्ध होणार. अण्वस्त्रे डागली जाणार, सर्जिकल स्ट्राइक होणार अशा प्रकारची भाषा काही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वापरली जाते. काही जण जगाची दोन गटात विभागणी करून मोकळे होतात. म्हणजेच महायुद्ध किंवा अण्वस्त्रे हा विषय काही चॅनल्सच्या “ब्रेकिंग न्यूज’चा विषय बनले आहेत.
युद्धखोरीची भाषा नकोच!
पाकिस्तान आणि चीन ही भारताची शत्रू राष्ट्रे आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना लागून असलेल्या सीमेवर कायमच युद्धजन्य परिस्थिती असते. अनेकदा प्रत्यक्ष युद्ध करण्याऐवजी पाकिस्तान दहशतवादाच्या रूपाने अप्रत्यक्ष युद्ध (हायब्रीड वॉरफेअर) करण्याचा प्रयत्न करतो. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अनेकदा भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी बॉम्बस्फोट करणे, लष्करी तळांवर हल्ले करणे यांसारखी कृत्ये करताना दिसतात.
अशा प्रकारची कृत्ये झाल्यानंतर देशात जी राष्ट्रीयत्वाची भावना येते त्यातून अनेकजण पाकिस्तानशी युद्ध करा, अण्वस्त्रे वापरा यांसारखी भाषा वापरताना दिसतात. परंतु, एखाद्या राष्ट्रावर अण्वस्त्रे टाकल्यानंतर किंवा त्या राष्ट्राशी युद्ध पुकारल्यानंतर त्याचे जे गंभीर परिणाम होतील याकडे कोणाचेही लक्ष जात नाही.
एका युद्धामुळे देश कित्येक वर्षे मागे जातो. अर्थव्यवस्था मोडकळीस येते. हजारो कुटुंबे दारिद्य्ररेषेखाली जातात. ज्या घरात युद्धामुळे मृत्यू होतो त्या घराची अवस्था दयनीय असते. याशिवाय अनेक नकारात्मक परिणाम हे युद्धामुळे विजयी आणि पराजीत देशाला भोगावे लागतात. अण्वस्त्रांचा हल्ला झाला तर काय होऊ शकते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
भारताला युद्धाचा अनुभव किती?
स्वतंत्र भारताच्या इतिहासात भारताने चार युद्धे लढली आहेत. त्यातील तीन पाकिस्तानशी व एक युद्ध चीनशी लढले आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात भारतीय जवानांचा थेट सहभाग होता. परंतु, यांपैकी एकही युद्ध हे विस्तीर्ण भारतीय क्षेत्रात लढले गेले नाही. दोन्ही महायुद्धांत भारताचा सहभाग असला तरी भारतीय भूमीवर प्रत्यक्ष युद्ध लढले गेले नाही. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान बरोबरील युद्धे ही सीमाभागापुरती मर्यादित होती.
चीनबरोबरील 1962चे युद्ध हे नेफा (अरुणाचल प्रदेश), जम्मू-काश्मीरचा पूर्व भाग व आजूबाजूच्या प्रदेशापुरते मर्यादित होते त्यामुळे भारतीय नागरिकांना व माध्यमांना युद्धाचा अनुभव असूनही नसल्यासारखा आहे. युद्धाचा अनुभव काय असतो हे सोव्हिएत युनियन (बॅटल ऑफ स्टॅलिनग्राड), फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, पोलंड, सर्बिया, उत्तर आफ्रिका यांना चांगलाच माहीत आहे; त्यामुळे युद्धखोरीची भाषा करणाऱ्या माध्यमांनी वरील राष्ट्रांचा अनुभवाचा जरूर अभ्यास करावा.
युद्ध हा अंतिम पर्याय आहे. जेव्हा चर्चेचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा युद्धाचा मार्ग अवलंबिला जातो. काही विकृत सत्ताधीशांमुळे जगावर दोन महायुद्ध लढण्याची वेळ आली असली, तरी जग आज आपले अस्तित्व राखून आहे. तिसरे महायुद्ध कोणालाही परवडण्यासारखे नाही; त्यामुळे माध्यमांनी तिसऱ्या महायुद्धाच्या तारखा ठरविण्यापेक्षा जगात शांतता कशी प्रस्थापित होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.