काठमांडू – नेपाळमध्ये प्रवासी विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये किमान 68 प्रवासी ठार झाले आहेत. पोखरा विमानतळावर उतरत असताना हे विमान दरीतल्या नदीमध्ये कोसळले, असे माध्यमांनी म्हटले आहे.
नेपाळमधील नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण “यति एअरलाईन्स’ने दिलेल्या माहितीनुसार 9 एन-एएनसी एटीआर-72 हे विमान काठमांडूतील त्रिभुवन विमानतळावरून सकाळी 10.33 वाजता पोखरा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी जाण्यासाठी निघाले होते. पोखरा विमानतळावर उतरत असताना नवीन विमानतळ आणि जुन्या विमानतळाच्या दरम्यान असलेल्या सेती नदीमध्ये ते कोसळले. विमानात 68 प्रवासी आणि 4 कर्मचारी असे एकूण 72 जण होते. त्यातील 10 प्रवासी विदेशी होते. घटनास्थळावरून एकूण 68 प्रवाशांचे मृतदेह मिळाले आहेत, असे नेपाळच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
विमान कोसळल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असल्याचे कासकी जिल्ह्याचे मुख्य जिल्हा अधिकारी तेक बहादुर के.सी. यांनी सांगितले. पंतप्रधान पुष्प कमल दहाल प्रचंड यांनी या घटनेची दखल घेऊन मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या दुर्घटनेबद्दल प्रचंड यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून गृह मंत्रालय, सुरक्षा अधिकारी आणि सर्व सरकारी यंत्रणांना तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
पोखरा विमानतळ हा चिनी कंपनीच्या मदतीने उभारण्यात आला आहे. या विमानतळाचे उद्घाटन प्रचंड यांनी दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधानपद स्विकारल्यानंतर केले होते. पंतप्रधान प्रचंड यांनी या अपघातातील मृतांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी 16 जानेवारीला सार्वत्रिक सुटी जाहीर केली आहे. या अपघाताच्या कारणांचा तपास करण्यासाठी 5 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येईल, असेही पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. अपघातानंतर लगेचच पोखरा विमानतळ आज दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आला.
विमान दरीत नदीत कोसळल्यानंतर लगेचच पोलिसांनी मदत कार्य सुरू केले आहे. मात्र या ठिकाणी पोचणे खूपच खडतर असल्याने अधिक मनुष्यबळ मदतीसाठी तैनात करणे शक्य नाही. विमानाच्या स्फोटानंतर लागलेली आग आटोक्यात आणणेही त्यामुळेच अवघड बनले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
5 भारतीयांचा समावेश
अपघात झालेल्या विमानात 5 भारतीय प्रवासी देखील होते. अभिषेक कुशवाह, बिशाल शर्मा, अलिल कुमार राजभर, सोनू जैसवाल आणि संजय जैसवाल अशी या भारतीय प्रवाशांची नावे असल्याचे यति एअरलाईन्सने म्हटले आहे. या वृत्ताला भारतीय दूतावासानेही दुजोरा दिला आहे. मात्र या प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या प्रवाशांबाबत माहिती मिळवण्यासाठी भारतीय दूतावास नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.