औरंगाबाद – जालना जिल्ह्यातील एका रेल्वे मार्गावर दगडाने भरलेले पिंप ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसच्या चालकाला शुक्रवारी पहाटे हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने गाडीला इर्मजन्सी ब्रेक लावल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना परतूर तालुक्यातील सातोना आणि उस्मानपूर स्थानकांदरम्यान रेल्वे गाडी पहाटे चारच्या सुमाराला आली असताना घडली. हा भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येतो.
लोको पायलटने आपत्कालीन ब्रेकचा वापर करून ट्रेन थांबवली. ट्रॅकच्या मध्यभागी पिंप असल्याचे आढळून आले. त्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हा अडथळा दूर केला. आणि नंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.