संगमनेर, (प्रतिनिधी) – गावातील राजकारण प्रशासनाला किती दबावाखाली ठेवते, याचा प्रत्यय संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील तरुणाला आला. तीन वर्षांपूर्वी जोर्वे गावात मातीमिश्रित वाळू लिलाव झाला होता. परंतु वाळू वाहतूक करताना संबंधित ठेकेदारांना अडचण येत असल्याने त्यातील काही लोकांनी दिगंबर काकड यांची भेट घेतली.
त्या ठिकाणाहून गेलेली पाईपलाईन काढून घेण्याची विनंती केली आणि त्याबदल्यात भरपाई देण्याचे आश्वासन दिले. परंतु “रात गई बाद गई” या उक्तीप्रमाणे त्या ठेकेदारांचे काम झाले आणि त्यांना आपण केलेल्या आश्वासनाचा विसर पडला. तीन वर्षे याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यानंतर एका पाईपलाईनवर कसेबसे शेती ओलीताखाली येत होती.
मात्र गेल्या काही दिवसांपासून गावातील काही नागरिक त्याच जागेतून वाळू तस्करी करून त्या जागेतील दुसरी पाईपलाईन तोडल्यामुळे संपूर्ण पिके करपून गेली आहेत. याबाबत पोलीस स्टेशनला बोलायला गेलं तर काकड यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. उलट काकड यांच्यावरच सावकारकीचा गुन्हा दाखल केल्याने संपूर्ण कुटुंब नैराश्यात आले असून योग्य न्याय मिळावा, या मागणीसाठी प्रशासनाच्या दारात चकरा मारत आहेत.
दिगंबर भाऊसाहेब काकड (रा. जोर्वे) यांनी सांगितल्याप्रमाणे तीन वर्षांपूर्वी गावात सुनील कारभारी दिघे हे आमच्याकडे आले. आमचे शेजारीच क्षेत्र असल्याने आम्हाला सहकार्य करा, अशी विनंती करून त्या ठिकाणाची पाईपलाईन काढून घेण्यास विनंती केली. त्यावेळी आम्ही तुम्हाला सहकार्य केल्याबद्दल पाईपलाईनची भरपाई देऊ, असे आश्वासन दिले.
मात्र, गेले तीन वर्ष त्यांनी पुन्हा डोकूनही पाहिले नाही. गेल्या काही महिन्यांपासून गावातील काही वाळू तस्करांनी पुन्हा वाळू वाहण्यास सुरुवात केली. दिगंबर काकड यांच्या गट नंबर 16 मध्ये असलेली पाईपलाईन तोडून टाकली. याबाबत तालुका पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंदही केलेली आहे. तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
त्यानंतर “तुम्ही आमच्या तक्रारी केल्यास तुमची शिल्लक राहिलेली पाईपलाईनही तोडून टाकू” असा पुन्हा दम भरला. याबाबत गावातील लोकांसमोर हा विषय मांडला तरीही आम्हाला न्याय मिळाला नाही. नंतर त्याच लोकांनी आम्हीसारख्या तक्रारी करत असल्यामुळे राहिलेली पाईपलाईनही तोडून टाकली.
नंतर काकड यांच्याशी झटापटही गेली आणि मुलाच्या डोक्यात गज मारला होता. 11 मार्च रोजी काकड कुटुंब पोलीस स्टेशनला गेले असताना रात्री एक वाजेपर्यंत त्यांना बसवून ठेवण्यात आले. गावातील काही राजकारणी लोकांमुळे पोलिसांवरती दबाव तंत्र सुरू झाले होते . काकड यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. हे सगळं प्रकरण घेऊन तहसीलदारांकडे गेले असता त्यांनी तलाठ्याला पंचनामा करण्यास सांगितले.
समोरच्या वाळू तस्करांनी वाळू काढलेल्या ठिकाणी झालेला खड्डा बुजवून टाकला. त्यामुळे तलाठ्याने सर्व आलबेल असल्याचा पंचनामा केला. त्यामुळे ना पोलीस, ना महसूल सहकार्य करते. आमच्या शेतात आम्ही जाऊ शकत नाही, माझ्याकडे 50 ते 55 जनावरे आहेत. आज त्यांना खारे पाणी पाजावे लागत असल्याने ते सतत आजारी पडत आहेत. शेतपिकांचे नुकसान होत आहे. संपूर्ण कुटुंब दहशतीमध्ये आहे. साहेब आम्हाला न्याय मिळवून द्या. किती वेळा प्रशासनाकडे चकरा मारू? अशी आर्त हाक काकड यांनी प्रशासनाला केली आहे.
मी हे सगळं प्रकरण तहसीलदार यांच्याकडे घेऊन गेलो असता दार उघडताच मी काही बोलायच्या आतच “तुझ्यावर किती गुन्हे दाखल आहेत बोल, तुला तडीपार करून टाकू” असे वरच्या आवाजात बोलले. तहसीलदार यांना आकाशवाणी झाली का? त्यांना मी यायच्या अगोदरच कसं माहिती ?- दिगंबर काकड, शेतकरी , जोर्वे