- भाषेत वापर न केल्यास केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचा ठरणार भंग
- “ळ’ऐवजी आता ‘ल’ वापरण्याची गरज नाही
पिंपरी – हिंदी भाषेत जळगाव, धुळे, तळेगाव, लोणावळा, यवतमाळ अशा नावांमधील शेवटचे अक्षर “ळ’ ऐवजी “ल’ लिहिणे हा केंद्र सरकारच्या हिन्दी निदेशालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेचा यापुढे भंग ठरणार आहे. केंद्र सरकारच्या हिंदी निदेशालयाने “ळ’ या वर्णाला राजभाषा हिंदीच्या परिवर्धित वर्णावलीमध्ये स्वीकृत केले आहे.
रावेत येथील साहित्यिक व भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांनी यासाठी वर्षभर पाठपुरावा केला. परिणामी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रेल्वे, बॅंका सर्व केंद्र सरकारी कार्यालये यांना यापुढे “ळ’युक्त स्थानिक नावांमध्ये बदल करता येणार नाही.
उल्लेखनीय म्हणजे निर्मळ यांनी गृहमंत्रालयाचा राजभाषा विभाग, उच्च शिक्षण मंत्रालयाचा हिंदी निदेशालय विभाग, त्याचप्रमाणे प्रसारण मंत्रालय, प्रधानमंत्री कार्यालय, राष्ट्रपती व राज्यपाल यांच्यासह विविध भाषांमधील विद्वान आणि राज्यातील विविध राजकीय नेते यांना वारंवार पत्र लिहून, फोन करून व प्रत्यक्ष भेटीद्वारे सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला. विविध लेख व व्याख्यानातून त्यांनी राजभाषा हिंदीमध्ये “ळ’ऐवजी “ल’चा वापर करणे चुकीचे आहे, हे पुराव्यांसह पटवून दिले.
निर्मळ म्हणाले, ज्या भाषेतून हिंदीचा उगम आहे ती संस्कृत, जे पाच भाषिक प्रवाह हिंदीला येऊन मिळतात ते राजस्थानी, हरयानवी, गढवाली, कुमायुणी, नेमाडी, हिंदी ज्यांचे नेतृत्व करते त्या 4 दक्षिणी भाषा, तिन्ही पश्चिमी भाषा आणि दक्षिण पूर्वेतील ओडिया भाषा अशा एकूण 14 भाषांत “ळ’ असूनही त्या वर्णाची उपेक्षा करणे चूक आहे. हिंदी ही उच्चारप्रधान भाषा आहे.
तसेच ती राजभाषा म्हणून सर्वसमावेशक असणे ही हिंदीची गरज आहे. लोकमान्य टिळक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नावे त्याशिवाय, श्रवणबेळगोळ, बेळगाव आदी स्थान मल्याळम, तमिळ या भाषांच्या नावाचे शेवटचे अक्षर हिंदीमध्ये “ळ’ ऐवजी “ल’ वापरले जाते. ही बाब जनभावनेला ठेच पोहचविणारी आहे.
हिंदीमध्ये “ळ’ नसता तरीही इंग्रजीने “छ’ साठी तरतूद केली. तशी तरतूद हिंदीला राजभाषा म्हणून करणे गरजेचे होते. हिंदीच्या राजभाषा विभागाने अशा कोणत्याही तरतुदीबाबत माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर उच्च शिक्षण विभागाकडे हा विषय वर्ग करण्यात आला. हिंदी भाषेच्या लेखनात अशा प्रकारची तरतूद केली असल्याचे स्पष्टीकरण उच्च शिक्षण विभागाने पत्र पाठवून दिले आहे.
– प्रकाश निर्मळ, साहित्यिक व भाषा अभ्यासक.