मुंबई – भाजप आणि शिवसेना हे जुने मित्र असल्याने शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून पुन्हा युती करावी. जर शिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सध्या फडणवीस-राऊत यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चा रंगत आहेत.
मुंबईत अभिनेत्री पायल घोष कथित अत्याचारप्रकरणी पत्रकार परिषद घेत रामदास आठवले यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. आठवले म्हणाले, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेजण माझे चांगले मित्र आहेत.
शिवसेनेने कॉंग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून शिवसेना-भाजप-आरपीआयचे सरकार बनवावे. उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. उर्वरित तीन वर्षे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद द्यावे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी अस्वस्थ आहे. जर शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत एकत्र येत सरकार स्थापन करावे, असे त्यांनी सांगितले.
पायलप्रकरणी गृहमंत्र्यांशी बोलणार
अभिनेत्री पायल घोषसोबत मी अर्धा तास चर्चा केली. काही वर्षांपूर्वी पायलवर अनुराग कश्यप यांनी अत्याचार केला आहे. याप्रकरणी मी विश्वास नांगरे-पाटील, अभिषेक त्रिमुखे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगितले आहे. आमचा पोलिसांच्या चौकशीवर विश्वास आहे.
मात्र, एवढा उशीर लागत असताना कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न आहे. अनुराग कश्यप मुंबईतच आहेत. तरीही त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलेले नाही. पायलला आपल्या जीवाची भीती आहे. तिने पोलीस संरक्षण मागितले आहे. याबाबत मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.