पिंपरी – अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन विविध अंगांनी स्मरणीय ठरले. प्रसिद्ध साहित्यिक, सिनेअभिनेते, अभिनेत्रींची उपस्थिती, दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल, नेहमीप्रमाणे रसिकाचा मिळालेला भरभरून प्रतिसाद आणि राजकीय पुढार्यांची भाषणे झाली. नाट्य संमेलनाने पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. उत्कृष्ट व्यवस्थापनाचा वस्तुपाठ घालून दिला. मात्र, याच संमेलनाच्या निमित्ताने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय नेत्यांनी आरोप आणि टीका करण्याची संधी सोडली नाही. नाटकाच्या दुस-या अंकात राजकीय नेत्यांनी साखर पेरणी केली आहे.
एकीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होईल याचा काही अंदाज बांधता येत नाही. राज्यातील सत्तानाट्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. अशा वातावरणात नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांनी फटकेबाजी करून मतदारांमध्ये एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी मिश्किलपणे राज्याच्या सारीपाटाचा संदर्भ देत टाळ्या घेतल्या. राज्यातील सत्तांतराच्या प्रयोगावर एखादा छानसा सिनेमा काढता येईल, या वक्तव्याने सत्तांतराच्या प्रयोगाच्या आठवणी जाग्या केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नाटकांच्या शीर्षकांचा उल्लेख करत रंगत भरली. त्यांनी नेमकेपणाने राज्यातील सत्तांतराचा क्रम लावत, भाषणात नियोजनबद्ध मांडणी केली. ते म्हणाले की, आमच्यासोबत 2019 मध्ये एक प्रयोग झाला, तो म्हणजे ‘कट्यार पाठीत घुसली. त्यानंतर 2022 मध्ये आम्ही एक प्रयोग केला तो म्हणजे‘ आता होती, गेली कुठे’ या वक्तव्याने त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. एवढ्यावरच न थांबता नाटकात तिसरी घंटा असते, तशी आमच्याकडे आचारसंहिता ही तिसरी घंटा असते. जे चांगली तालीम करतात, त्यांना आशीर्वाद मिळतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांचा उल्लेख टाळत नाटकं करणार्यांना जनता घरी बसविते, हे सांगायला ते विसरले नाहीत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात नाट्य परिषदेच्या राजकीय वाटचालीकडे लक्ष वेधले. नाट्यसृष्टी, लोककला हे जर सांस्कृतिक चळवळीचा भाग आहेत. ही चळवळ वाचविण्यासाठी नाट्य परिषदेने गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवावे, असे सांगत आमच्या राजकारण्यांमध्ये गट असतात. नाट्य परिषदेला पक्षीय राजकारणाचा लवलेशही लागू देऊ नका, असा सल्ला दिला.