पिंपरी -रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमण अनेक अपघातांना निमंत्रण देत आहे. चालू वर्षात पहिल्या दहा महिन्यांमध्ये 730 अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सध्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर पोलिसांची कारवाई सुरु आहे. त्यानंतर आता रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
शाहूनगर चिखली येथे गुरुवारी (दि.24) ट्रकखाली चिरडल्याने लहान मुलाचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत उहापोह झाला. रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांच्या बाजूला धूळ खात पडलेली वाहने, बेशिस्त वाहन चालक, बंद पडलेले सिग्नल अशी अनेक कारणे अपघातांना निमंत्रण देत आहेत. पदपथांवर अतिक्रमण झाल्याचे अनेक ठिकाणी उघडकीस आले आहे. पदपथांसह रस्ते मोकळे करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. शहरात पाच औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्याची मोठी आहे. त्यामुळे अवजड वाहनांना दिवसा वाहतुकीसाठी प्रतिबंध करता येईल का? किमान शाळा भरण्या सुटण्याच्या वेळी तरी ही वाहतूक थांबवता येईल का? याबाबत पोलिसांची चाचपणी सुरु आहे. प्रत्येक चौकात ठराविक अंतर “नो पार्किंग’ कटाक्षाने पाळायला हवे.
शहरात फेरीवाले, पथारीवाले, फूड कॉर्नर मुख्य रस्त्यावर दिसतात. पण त्यांना तिथे थांबता येणार नाही. रस्त्यावर पहिला अधिकार हा पादचारी नागरिकांचा आहे. त्यानंतर वाहनांचा आहे. फेरीवाले, पथारीवाले आणि फूड कॉर्नर अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांना, वाहनांना अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी असावेत. याबाबत पोलीस कारवाई करणार आहेत. बेशिस्त वाहतूक आणि अन्य समस्यांबाबत अभियान राबवले जात आहे.
– डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त
दहा महिन्यातील अपघात – 730
मृत्यू – 290
जखमी – 448