पिंपरी – देशातील सार्वजनिक प्रकल्प विक्रीस काढून देशाला देशोधडीला लावण्याचे, तरुणांना बेरोजगार करण्याचे आणि उद्योगपतींना पूरक ठरतील असे निर्णय घेण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. भाजपच्या हुकूमशाही धोरणामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष ऍड. सचिन भोसले यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने होऊ द्या चर्चा हे अभियान पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात बास झाली तुमची मन की बात, आता ऐका तुम्ही जन की बात अशी 70000 पत्रके वाटून जनजागृती केली जात आहे. रविवारी शाहूनगर, पूर्णा नगर येथे या अभियान अंतर्गत नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी माजी शहर प्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, उपशहर प्रमुख तुकाराम पाटील, विधानसभा प्रमुख तुषार नवले, पिंपरी चिंचवड पिंपरी विधानसभा महिला संघटिका वैशाली कुलथे, शहर संघटक राजू जाधव, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, श्रीकांत करोली, विभाग प्रमुख विठ्ठल कळसे, प्रदीप साळुंखे, उपशहर प्रमुख श्रीकांत करोली तसेच कामिनी मिश्रा, राजाराम कुदळे, गुलाब गरुड, शैलेश मोरे, संजय दुर्गुळे, अनिल तारू, संजय पाटील तसेच शाहूनगर पूर्णा नगर परिसरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
माजी शहर प्रमुख योगेश बाबर म्हणाले की, सध्याचे पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान नसून गुजरातचे पंतप्रधान आहेत. असे बहुरूपी पंतप्रधान यापूर्वी देशाला कधी मिळाले नव्हते. हे पंतप्रधान प्रसिद्धी लोलुप असून त्यांची ध्येय धोरणे हुकुमशाही कडे वाटचाल करणारी आहेत. सुरुवातीला शिवसैनिकांनी पथनाट्य सादर केले. स्वागत, प्रास्ताविक तुकाराम पाटील यांनी केले.