नाणे मावळ (अतुल चोपडे) – मावळ तालुका हा निसर्ग सृष्टी व नैसर्गिक संसाधन सामग्री बहरला आहे. मावळातील वनसंपदा ही पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते. सोबतच पर्यटकांना आकर्षित करुन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ देणाऱ्या या वनसंपदेचा काही लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बळी देताहेत. वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार आणि बेकायदा उत्खननाने वन परिसर धोक्यात येताना दिसत आहे.
डोंगर-दऱ्या, घनदाट जंगले, वेगवेगळ्या प्रकारचे पशू-पक्षी असा हा मनमोहक परिसर पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो. अनेकांनी येथे पर्यटकांनी सुविधा देणारे अगदी टपऱ्यांपासून ते मोठ्या रिसोर्टपर्यंत व्यवसाय उभारले आहेत. हा वन परिसर केवळ पशू-पक्ष्यांचाच नव्हे तर मनुष्याच्या उदरनिर्वाहाचा स्त्रोत बनला आहे. परंतु कमी वेळात अधिक पैसे मिळविण्याच्या लोभाने काही लोकांनी या निसर्गावरच घावा घालण्यास सुरुवात केली आहे.
मावळातील अति दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात दाट वनराई, जंगल असल्याने येथे बऱ्याच प्रमाणात वन्य प्राण्याचा वावर असतो. मावळ तालुक्यात नाणे मावळ, अंदर मावळ व पवन मावळ मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारीत येतात. नाणे मावळातील सह्याद्रीच्या डोंगररांगेतील घनदाट जंगलात शिकार राजरोसपणे सुरू आहे. मावळ तालुक्यात शिरोता आणि वडगाव मावळ ही दोन वनपरिक्षेत्र येतात. शिरोता वनपरिक्षेत्रात येत असलेल्या गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते.
निसर्गाला हानी पोहचवणारी निवासस्थाने
निसर्गाच्या सान्निध्यात निवासस्थान असे गोंडस नाव देत निसर्गालाच हानी पोहचविण्यचा प्रकार सध्या येथे सुरू आहे. बेकायदेशीर वृक्ष तोड, उत्खननही वाढले आहे. सह्याद्रीच्या डोंगर माथावर शासनाची परवानगी नसताना त्या ठिकाणी झाडे तोडून, खोदकाम करत जमीन समतल करण्यात येत आहे. त्यानंतर तिथे अलिशान असे फार्म हाउस बांधले जात आहे. तसेच नैसर्गिक ओढ्या-नाल्यांवर भराव टाकून अतिक्रमण केले जात आहे. ह्याकडे ना शासनाचे कर्मचारी ना लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत.
पाणवठ्यावर प्राण्यांची शिकार
काही दिवसांपासून नाणे मावळात प्राण्याच्या शिकार होत आहेत. प्रामुख्याने या शिकार सुट्टीच्या दिवशी होत आहे. शिकारीसाठी खास बेत व पूर्व नियोजनही केले जात आहे. मावळ तालुक्यात नाणे मावळ, अंदर मावळ व पवन मावळ मावळातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भागामध्ये मोठी वनराई, जंगले, मोठी धरणे, तलाव, नदी, ओढे असून डोंगर पठारावरील जंगलातील पाणी कमी झाल्यास वन्यप्राणी या पाण्याच्या ठिकाणी पाणवठ्यावर येतात. उदा. रान डुक्कर, सायाळ, ससे, मोर, लांडोर, सांभार आदी प्राण्यांचा प्राण्यांची शिकार केली जाते. ह्या शिकारीमुळे ग्रामीण जन जीवन विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातील बहुतेकांनी हा रोजगार बनवला आहे.
चंदनाची झाडे व लाल मातीची चोरी
तसेच काही ठिकाणी जंगलातून चंदनाच्या झाडांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच डोंगर माथा उकरून लाल मातीची चोरी ही दिवसा ढवळ्या होत आहे. हे सर्व प्रकार वन्य जीवनाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहेत. वन अधिकारी व कर्मचारी यांनी हे प्रकार रोखण्यासाठी कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.