पिंपरी – वातावरणात वाढलेला गारठा, पावसाची हजेरी, ढगाळ वातावरण अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सर्दी, ताप, खोकल्याने त्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी ‘व्हायरल फिवर’ राहतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
काही दिवसांपासून राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात गारठा वाढला आहे. त्यातच दोन दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावली आहे. या बरोबरच ढगाळ वातावरणही आहे. या लहरी वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात बहुतांश रुग्ण व्हायरलचे आढळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हा त्रास दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी राहत आहे. त्यामुळे नागरिक घाबरून जात आहेत. मात्र, घाबरून न जाता योग्य उपचार घेतल्यास बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
अशी आहेत लक्षणे
1) सर्दी, खोकला.
2) घसा खवखवणे.
3) कणकण आणि ताप
4) डोकेदुखी.
5) नाक गच्च राहणे.
ही घ्या काळजी
1) थंडीत बाहेर पडताना योग्य खबरदारी घेणे.
2) सकाळी कोमट पाणी पिणे.
3) मास्क वापरणे.
4) योग्य औषधोपचार घेणे.
बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. याचा त्रास दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक राहत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. थोडे दिवस ही लक्षणे राहतात. मात्र योग्य खबरदारी घ्यावी. गारठ्यात बाहेर पडताना योग्य काळजी घेतल्यास बरे वाटते.
– डाॅ. राजेंद्र सोनी, विभागप्रमुख, मेडिसीन विभाग, पदव्युत्तर संस्था वायसीएम.