पिंपरी – मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. राज्य सरकारचा आदेश असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे १३७० शिक्षक या कामात व्यस्त आहेत. परीक्षा तोंडावर आलेली असताना शिक्षक सर्वेक्षणात असल्याने पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम कोण पूर्ण करणार? सर्वेक्षण पूर्ण करावे का विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम या संभ्रमात शिक्षक असून शिक्षकांबरोबर ही विद्यार्थ्यांचीही परीक्षा असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा सध्या शहरात सुरु आहेत. दोन्ही विभागाच्या पहिली ते दहावीच्या वर्गात सुमारे ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. १३७० शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. मनपा शाळेतील पहिली ते दहावीच्या एकूण विद्यार्थी संख्या पाहता शिक्षक कमी पडू लागल्याने २६० कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. त्यातच मराठा आरक्षण मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने मराठा कुणबी, कुणबी मराठा मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. या कामासाठी महापालिकेचे १३७० शिक्षक प्रगणक म्हणून नेमले आहेत. हे सर्व शिक्षक शाळेतील नियमित काम सोडून संपूर्ण शहरात घरनिहाय सर्वेक्षण करत आहेत.
दहावी बोर्डाची परीक्षा लवकरच सुरु होणार आहे. त्यातच काही तुकड्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे. तो पूर्ण करण्यासाठी शिक्षकच वर्गात उपस्थित नसल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले आहे. अभ्यासक्रम पूर्ण नसेल तर विद्यार्थी परीक्षेचा पेपर समाधानकारक सोडवू शकणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय, पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची देखील परीक्षा मार्चमध्ये सुरु होत आहे. बहुतांश वर्गांचा वार्षिक अभ्यासक्रम वेळेत पूर्ण झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
४५ हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न
महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे १३७० शिक्षक मराठा समाजाच्या सर्वेक्षणात गुंतले आहेत. त्यामुळे पहिली ते दहावीच्या वर्गातील ४५ हजार विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम २६० कंत्राटी कर्मचारी करत आहेत. हजारो विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम एवढ्या कमी संख्येने उपस्थित असणा-या शिक्षकांवर सोपविले आहे. ते प्रामाणिकपणे अध्यापनाचे कार्य करतीलच याची शक्यता कमी आहे. त्यातील काही शिक्षक सुट्टीवर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व शिक्षक मराठा सर्वेक्षणाचे काम करत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत प्रत्येकी दोन शिक्षक याप्रमाणे २६० कंत्राटी शिक्षक नेमले आहेत. दहावीचा अभ्यासक्रम जवळपास पूर्ण झालेला आहे. सध्या सराव घेतला जात आहे.
– विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, शिक्षण विभाग