पुणे – राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. प्रचलित शासन निर्णयाचे पालन करूनच ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने दिले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ चे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या चाचणीसाठी एकूण २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी २ लाख़ १६ ह्जार ४४३ उमेदवार प्रविष्ट झाले. जून ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदुनामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदुनामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या १० टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या ७० टक्के रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे धोरण सन २००४ पासून शासनाने अंगीकारलेले आहे. अर्थात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या शाळांचे प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शाळा या मराठीतूनच शिक्षण देणाऱ्या आहेत. या शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करताना ते शिक्षक गुणवत्तावान असावेत, या हेतूने इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या संज्ञेची व्याप्ती निश्चित करण्याच्या दृष्टीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सध्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर शिक्षकांची २ लाख १४ हजार पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या इंग्रजी माध्यमाच्या संदर्भात कार्यवाही होत असलेली सेमी इंग्रजी व साधन व्यक्ती मिळून ५ टक्क्यांपेक्षाही कमी आहेत, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.