सांगवी -वाकड – भोसरी बीआरटीएस रस्त्यावर पिंपळे गुरवमधील गजेबो हॉटेल चौक व कल्पतरू इस्टेट चौकात रेड सिग्नल असतानाही खासगी वाहने सुसाट सुटलेली असतात. यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे या दोन्ही चौकात गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नाशिक फाटा उड्डाणपुलावरून पिंपळे सौदागरकडे जाणारा मुख्य रस्ता आणि बीआरटीएस रस्ता यामुळे पिंपळे गुरवमधील नागरिकांना रस्ता ओलांडणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडण्याची कसरत करावी लागते.
या मुख्य रस्त्यामुळे काशिद पार्क परिसर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असून काशीद पार्क, महाराष्ट्र कॉलनी, निसर्ग कॉलनी यासारख्या मोठ्या बंगल्याचाही समावेश आहे. तरतर, सोहम, खुशबू, स्प्रिंग, ट्रेझर, आशीर्वाद, करण, मुक्तांगण यासारख्या मोठ्या सोसायट्यांचा समावेश आहे. या परिसराची लोकसंख्या सहा ते सात हजार आहे.
या नागरिकांना धोकादायक रस्त्यावरून चौक ओलांडावा लागतो. तर, रेड सिग्नल असतानाही वाहनचालक चौकात थांबायला तयार नाहीत. त्यामुळे याठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. या परिसरातील नागरिकांना शाळा, कॉलेज, भाजी, किराणा खरेदीसाठी, तसेच नोकरी-व्यवसायासाठी ये- जा करण्यासाठी चौकाचा वापर अपरिहार्य आहे. त्यामुळे या चौकात बीआरटीएस रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
रस्ता ओलांडताना अपघात
अनेकदा लाल दिवा लागलेला असतानाही वाहतूक पोलिसांच्या समोरून चारचाकी वाहने सुसाट जातात. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, लहान मुले, महिला यांना पायी रस्ता ओलांडताना अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागले आहे. त्यातून चार नागरिकांना कायमचे अपंगत्वही आले आहे, तर तीन जणांचा मृत्यू देखील या ठिकाणी झालेला आहे.
पादचारी पुलाची मागणी
कल्पतरू चौक येथे काशीद पार्क ते कल्पतरू सोसायटी यांना जोडणारा पादचारी पूल असणे ही काळाची गरज बनलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे स्मार्ट सिटीच्या शिर्षकामध्ये नागरिकांना भौतिक गरजा या उपलब्ध करून देणे हा मूळ हेतू आहे. याचाच एक भाग म्हणून ज्या समस्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो, ही समस्या कायमस्वरूपी सुटण्याची आवश्यकता आहे. या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी लोखंडी पादचारी पूल तातडीने उभारण्यात यावा, ही या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.