शरद पवार यांचा इशारा,’एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. अशात काल १७मेला मुंबईत सभांचा धडाका झाला. मुंबईत अन् राज्यात पहिल्यांदाच मोदीराज पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर दिसले.
अशात या सभेवरून शरद पवार यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. हा आम्हाला भटकता आत्मा म्हणाले. एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटल आहे.
ते पुढे म्हणाले,’ ज्या बाळासाहेब ठाकरेंनी संकटाच्या काळात तुम्हाला वाचवलं. तुम्ही विसरला. तुम्ही काहीही म्हटलं टिकाटिप्पणी केली. तरी मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार जो उद्धव ठाकरे घेऊन जात आहे, त्यामागे शक्ती उभी केल्याशिवाय राहणार नाही.’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदींवर टीका करतांना म्हणाले,’तुम्ही कितीही टीका केली तरी राज्यातील सामन्य माणूस ढुंकूनही पाहणार नाही. तुम्ही आमच्यावर टीका केली. महाराष्ट्रात कुणी तरी भटकता आत्मा आहे. आत्मा कधी असतो तर माणूस गेल्यावर असतो. आम्हाला भटकता आत्मा म्हणाले. एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची ताकद आहे. तुम्हा सर्वांच्या मदतीने आमच्याकडे आहे, त्याची उपयुक्तता घेतली जाईल.’ असं शरद पवार म्हणाले.





