इंद्रायणीनगर – उद्योगनगरीमध्ये बहुतांश ठिकाणी रोहित्रांचा स्फोट होऊन जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे महावितरणने शहरातील रोहित्रांना पत्र्याचे संरक्षक कवच बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील बहुतांश रोहित्रांना कवच बसविण्यात आले. परंतु अजूनही मोठ्या प्रमाणावर रोहित्रांना संरक्षक कवच बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी महावितरणने रहदारीच्या मार्गांवरील तसेच लोकवस्तीमधील रोहित्रांना तरी संरक्षक कवच बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरात वर्दळीच्या रस्त्यालगत त्याचप्रमाणे नागरी वस्तींमध्ये विद्युत रोहित्रे आहेत. मात्र, त्यातील काही रोहित्रांना पत्र्यांचे संरक्षक कवच बसविलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा स्फोट झाल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. रोहित्रांचा स्फोट होऊन यापूर्वी चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रोहित्रांच्या रूपात तिथे ‘जिवंत बॉंबच’ आहेत, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहे.
भोसरीतील दिघी रस्त्यावर गीताई सहकारी गृहरचना रस्ता, आदर्शनगर चौक, प्रियदर्शिनी शाळा चौक, सिद्धेश्वर शाळा चौक, दिघीतील आदर्शनगरातील पोलीस कॉलनी रस्ता, पवळी रस्ता, भारतमातानगरातील जय हनुमान कॉलनी, भोसरीतील इंद्रायणीनगरमधील पेठ क्रमांक दोनमधील इमारत क्रमांक 22 व 24 जवळ आदी भागांसह इतरही वर्दळीच्या रस्ता व नागरी भागात महावितरणच्या काही विद्युत रोहित्रांना पत्र्यांचे संरक्षक कवच बसविलेले नाही. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्रांचा स्फोट होऊन, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.
यापूर्वी घटलेल्या दुर्घटना
चिंचवडमध्ये 7 मे 2016 रोजी विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन एका अपंग नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे 5 सप्टेंबर 2020 रोजी भोसरीतील इंद्रायणीनगर येथे विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत आई, मुलगी आणि नात अशा तिघांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे 4 मार्च 2020 रोजी चिंचवडमधील वेताळनगरात तर 2 9 डिसेंबर 2021 रोजी भोसरीतील शांतिनगरमधील विद्युत रोहित्राने पेट घेतला होता. सुदैवाने यात जीवितहानी झाली नव्हती. काही दिवसांपूर्वी जाधववाडी परिसरातील रोहित्र फुटून ऑइल उडल्याची घटना घडली. तर शरदनगर येथील हनुमान मंदिरच्या शेजारी असलेल्या रोहित्राचा देखील स्फोट झाला होता. असे असतानाही महावितरणद्वारे परिसरात असलेल्या विद्युत रोहित्रांना संरक्षक कवच बसविण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
महावितरणच्या माध्यमातून शहरातील रहदारीच्या भागात, लहान मोठे व्यावसायिक व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी, मंदिर परिसर आदी ठिकाणी सुरक्षेसाठी पत्र्याचे संरक्षक कवच बसविलेले आहेत. परंतु अजूनही काही ठिकाणी गरज असल्यास सर्वेक्षण करून सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येतील.
– निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.