पिंपरी – भारत देशाची फाळणी आणि त्याचे परिणाम सदैव स्मृतीमध्ये राहावेत, यासाठी दि.14 ऑगस्ट हा दिवस फाळणी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दृष्टीने शहरांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, 75 वर्षांपूर्वी 14 ऑगस्ट याच दिवशी अखंड भारताचे दोन तुकडे झाले. ही वेदना लक्षात घेऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्ट हा दिवस “फाळणी दिन’ म्हणून स्मरणात ठेवला जाईल. देशाची फाळणी कशी भयावह ठरली? आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी ऑगस्ट रोजी हा विशेष दिवस साजरा केला जाणार आहे. त्यादृष्टीने मार्गदर्शक तत्वे आणि सूचना पाळून हा दिवस साजरा होणार आहे.
शहरात प्रत्येक मंडलात “विभाजन विभीषिका स्मृती दिवस” संबंधी बॅनर व हातात तिरंगा झेंडा घेऊन मूक मिरवणूक यात्रा काढण्यात येणार आहे. या मिरवणूक यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचे वक्तव्य, भाषण, मुलाखत, घोषणा इत्यादी करु नये. संपूर्ण कार्यक्रम मूक असेल. मिरवणूक यात्रेत फक्त राष्ट्रध्वज हातात घ्यायचा आहे, असे भाजपच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.