पवनानगर- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जुलै अखेरपर्यंत 218 मिलिमीटरने अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढला असून, सोमवारी (दि. 31) दुपारी चारपर्यंत 86.87 टक्के धरण भरले. गेल्या वर्षी हेच प्रमाण 81.30 टक्के होते. सध्या उपयुक्त पाणीसाठा 208.09 मिलिमीटर असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 2.30 दशलक्ष घनमीटरने अधिक आहे. त्यामुळे शहराची 31 जुलैपर्यंत 2024 पर्यंतची चिंता मिटली आहे. शहरवासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत सोडलेले अशुद्ध पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. दररोज 510 दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा केला जातो. तेथून वाहिन्यांद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. त्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा होतो. शिवाय, “एमआयडीसी’कडून दररोज 30 एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच, आंद्रा धरणातून दररोज 50 एमएलडी पाणी शहराला मिळत आहे. इंद्रायणी नदीतून त्याचा उपसा करून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. तेथून चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होलीसह अन्य भागात वितरित केले जात आहे.