- दीडशे कोटी रुपयांचा खर्च; पाणी प्रश्न सुटण्यास होणार मदत
पिंपरी – भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी दररोज 167 दशलक्ष लिटर पाणी आणण्यासाठी आवश्यक जलवाहिनीच्या कामाला महापालिका स्थायी समिती सभेत बुधवारी (दि. 23) मंजुरी देण्यात आली. जलवाहिनीसाठी दीडशे कोटी रुपये खर्च होणार आहे. धरणापासून देहूपर्यंत टाकण्यात येणाऱ्या या जलवाहिनीचे काम तीन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे शहराला सध्या जाणवणारा पाणी प्रश्न सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होणार आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. समितीसमोर विषयपत्रिकेवरील 23 विषय मंजुरीसाठी होते. तर, आयत्या वेळी 4 विषय मंजुरीसाठी होते. एकूण 205 कोटी 98 लाख रुपयांच्या विकासकामांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून देहूपर्यंत एकूण 27.70 किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
दोन टप्प्यांमध्ये ही जलवाहिनी टाकली जाणार आहे. धरणापासून नवलाख उंब्रेपर्यंत 1700 मि.मी. व्यासाची जलवाहिनी तर, नवलाख उंब्रेपासून देहूपर्यंत 1400 मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. धरणापासून नवलाख उंब्रेपर्यंत टाकण्यात येणाऱ्या 8.80 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीसाठी 55 कोटी 37 लाख 79 हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. तर, नवलाख उंब्रेपासून देहूपर्यंत 18.90 किलोमीटर अंतरात टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसाठी 100 कोटी 96 लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. तीन वर्षात हे काम पूर्ण केले जाईल.
पाच गावांना मिळणार अतिरिक्त पाणी
भामा-आसखेड धरणातून मिळणारे पाणी प्रामुख्याने चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी व मोशी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वितरित करण्याचे नियोजन आहे. वन विभाग, पुणे पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद (पुणे) यांच्या मालकीच्या जागेतून ही जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. नवलाख उंब्रे येथे 2 दशलक्ष लिटर क्षमतेची ब्रेकप्रेशर टाकी उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, या कामासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा-आसखेड धरणातून दररोज 167 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्यात येणार आहे. जलवाहिनीच्या विषयाला मंजुरी मिळाली आहे. आता या कामाला गती येईल. पवना बंद जलवाहिनीचा विषयही लवकरच मार्गी लावण्याचे नियोजन आहे.
– संतोष लोंढे, अध्यक्ष, स्थायी समिती.