रांची – माणूस आणि हत्ती यांच्या संघर्षात अनेक बळी जात असल्याने हत्तीची घुसखोरी लक्षात आणून देणारी आणि त्यांना रोखणारी यंत्रणा असणारी उपकरणे प्रायोगिक तत्त्वावर चाईबासा परिसरात लावण्यात येणार आहेत.
अनिमल इंट्रूजन डिटेक्शन अँड रिपेलन्ट सिस्टम ( अनायडर्स) असे या उपकरणाचे नाव आहे. ते यांत्रिक बुजगावण्याप्रमाणे काम करेल. झारखंडमधील चाईबासाच्या दक्षिणेकडील जंगलात ऑक्टोबरपासून हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.
माणूस आणि हत्तीच्या संघर्षात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याबरोबरच माणसांचेही बळी जात असल्याने ही उपाययोजना करण्यात येत आहे. या भागातील खाण उद्योगांना आता वन्यजीव व्यवस्थापन योजना बंधनकारक करण्यात आली आहे.
चाईबासा वन्य विभागातील नोआमुंडी येथील लोह खाणी टाटा स्टीलला भाड्याने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे टाटा स्टीलने वन्यजीव व्यवस्थापन योजना तयार केली आहे आणि गेल्याच महिन्यात वनविभागाने या योजनेला मंजुरी दिली आहे. आता या योजनेअंतर्गत या भागात अनायडर्स उपकरणे बसवण्यात येणार आहेत. गाझियाबादमधील क्यारी या कंपनीला अशी उपकरणे बसवण्याचा अनुभव आहे. पहिल्या टप्प्यात हत्तींमुळे प्रभावित असलेल्या गावांमध्ये आणि हत्तींचा वावर असलेल्या 18 ठिकाणी हे अऩायडर्स बसवण्यात येणार आहेत.
माणसाने जंगलांवर केलेले अतिक्रमण आणि हत्तींची वाढती संख्या यामुळे झारखंड राज्याच्या निर्मितीनंतर म्हणजेच 2000 पासून जून 2020 या वीस वर्षांच्या काळात हत्तींच्या हल्ल्यात 1,405 नागरिक मरण पावले आहेत तर नागरिकांनी केलेल्या प्रतिकारात 80 हत्तींना जीव गमवावा लागला आहे. सध्या झारखंडमध्ये हत्ती आणि माणूस यांच्यातील संघर्षाच्या सरासरी दोन घटना घडतात. खाणींची संख्या वाढत असल्याने आणि दुसरीकडे जंगलाचे क्षेत्रफळ कमी होत असल्याने हत्तींचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे हत्तींना सक्तीने आहारतही बदल करावा लागत आहे.
या आधी हत्ती बांबूची रोपे खात असत आता ते भात आणि मक्याच्या पिकांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. मक्याची कणसे खाण्याची सवय लागलेली हत्तीचे बछ़डे मोठे झाल्यावर तेच प्रमुख अन्न म्हणून खाऊ लागले आहेत. दुसरीकडे हत्तींच्या अधिवासाच्या परिसरात माणसांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे आणि हत्तींच्या संवर्धनासाठी सरकारचा दृष्टीकोन हा मनापासूनचा नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.
फेब्रुवारी 2016 ते जानेवारी 2020 या चार वर्षांच्या काळात हत्तींनी पिक, घरे उध्वस्त केल्याच्या आणि धान्यसाठ्यांवर तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले केल्याच्या 30,341 घटना घडल्याची नोंद आहे. आता जी अनाडयर्स उपकरणे बसवण्यात येणार आहे ती यांत्रिक पद्धतीने बुजगवण्यासारखे काम करणार आहेत. यापूर्वी हत्तींना रोखण्यासाठी वीजेचा प्रवाह असलेल्या कुंपणाचे प्रयोग करून झाले आहेत.
आता जे अऩायडर्स बसवण्यात येणार आहेत त्यांमध्ये हत्तींची चाहूल लागण्याची यंत्रणा आहे. ती चाहूल लागताच हत्तींनी पिकांचे नुकसान करण्यापूर्वीच त्यांना अनायडर्स घाबरवून टाकते. त्यामध्ये अक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्फ्रारेड किरणांचा वापर करण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर सौरउर्जेचा वापर, स्वयंचलित चालू/बंद, विविध आवाज व प्रकाश फेकणे, जीएसएम नेटवर्कद्वारे रिअलटाई कम्युनिकेशन ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. या उपकरणांची चाचणी वर्ल्ड वाईल्ड फंडाने भारतात घेतली असून त्यावेळी या 86 टक्के वेळा हत्तींना रोखण्यात यश आले असून पिकांचे उत्पादन 60 टक्क्यांनी वाढले आहे, असे क्यारी कंपनीच्या शिरीष ओझा यांचे म्हणणे आहे.
अशाप्रकारचे 18 अनायडर्स बसवण्यासाठी 47 लाख रुपये खर्च येणार आहे. हा खर्च टाटा स्टील कंपनीतर्फे उचलण्यात येणार आहे. त्याचबरोबर या उपकरणांच्या देखभालीची सात वर्षे जबाबदारी टाटा स्टीलकडे असणार आहे.