नेहमीप्रमाणे गणेश पिंपळाखाली कबीरची वाट पाहत बसला होता. शाळा भरायला अजून उशीर होता. बसल्याबसल्या काय करायचं म्हणून गणेशने दप्तरातून एक वही आणि डिंकाची बाटली काढली. वहीचा एक कागद फाडला आणि तो जमिनीवर पडलेली झाडाची पानं गोळा करू लागला. कागदावर एकेक करून पिंपळाची पानं डिंकाने चिटकविण्यात तो गुंग होऊन गेला. तेवढ्यात त्याच्या कानावर दुरून सायकलच्या घंटीचा आवाज पडला. चढावरून कबीर सायकल हातात ढकलत ढकलत आणत होता.
गणेश त्याला बघून हातवारे करून मोठ्याने ओरडू लागला. “”कबीर, लवकर ये. ह्ये बग मी काय केलंय.” कबीर धापा टाकत झाडाखाली आला. सायकल झाडाला टेकवली आणि गणेशजवळ बसला. “”कसलं भारी केलंस. मला पण शिकव की.” “”बरं. तिथली पानं आन गोळा करून. ह्ये बग, ही बाप्पाची सोंड, ह्ये बाप्पाचं कान, ह्ये बाप्पाचं पोट…” असं करताकरता एकदाचे बाप्पा पानाच्या रूपात कागदावर अवतरले! “”…आणि हा झाला आपला गणपती बाप्पा.” एकाच सुरात, “गणपती बाप्पा मोरया’ म्हणताना त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एक निरागस आनंद दिसत होता.
कबीरने दोघांचीही दप्तरं पुढं अडकवली. “”बसलास का?” “”हो.” कबीर कधी नळीखालून पॅंडल मारत सायकल चालवत होता; तर कधी चढाला हाताने ढकलत पुढे पुढे जात होता. “”उतरू का मी?” शर्टाच्या बाहीने घामाचे ओघळ पुसत, “”नगं. आता पुडं उतारच हाय. मंग बग कसली चिंगाट पळवतो. आणि मग काय बघायलाच नको.” उतारावर वाऱ्याला चिरून सायकल पळवताना खड्डे म्हणू नका; की वाटेत सुस्त होऊन पडलेल्या म्हशी म्हणू नका! कबीर त्यांना अगदी शिताफीनं कट मारत होता. “”कबीर, लई नगं पळवूस.” “”घाबरू नगंस. नाय पाडत तुला. इस्वास ठेव.” शाळा आली आणि दोघेही वर्गात जाऊन बसले. शाळा सुटल्यावर, “”जाशील ना हितनं? आज आम्मीनं लवकर घरी यायला सांगितलंय.” “”जाईल.” “”उद्या लवकर यं.” कबीर गणेशला घराच्या वाटेवर सोडून निघून गेला. गणेश घरी आला. “”आई, मला भूक लागलीय.” “”हातपाय धून घे. वाढते.” गणेश जेवायला बसला. तेवढ्यात, “”आई, आबा आलं.” किसनने हातातलं फावडं आणि घमेलं दारातच टाकून दिलं. तोंडावर पाणी मारल्यासारखं केलं आणि घरात येऊन बाजेवर आडवा झाला. “”तुमि, आन एवड्या इदूळा.” किसन डोक्यावर हात ठेवून तसाच पडून राहिला. “”आवं, काय दुकतबीकत तर न्हाय ना? आन खंड्याला रानातच ठेवलं व्हय? आज मनलं त्याला आंबवण करून देता ईल.” किसनने काहीच न बोलता आपली कूस वळवली. नवऱ्याला असं गप्प झालेलं पाहून कुसुमचा चेहरा चिंतेनं व्याकुळ झाला. त्याच्या पायाजवळ बसून, “”आवं, काय झालंय? बोला की कायतरी.” किसन एका बाजूला तोंड करून डोळ्यातून पाणी टिपत होता. त्याला असं रडताना पाहून कुसुमचा जीव कासावीस झाला. आपल्या खंड्याला सावकारानं ओडून नेलं. असं म्हणत किसन हुंदके देऊ लागला. हे ऐकताच गणेशने हातातला घास तसाच धरून ठेवला. तो ताटावरून उठून आपल्या बापाजवळ जाऊन बसला. “”आबा, रडू नगस. आपण आपल्या खंड्याला परत आणू.” “”कुटणं फेडायचं त्याचं कर्ज. होतं नव्हतं तेव्हडं पीक करपून गेलं. इश घ्यायला पैसा नाय; आन त्याला याजासकट द्यायला पैसं आणायचं तरी कुटनं? फास लावून घिऊ का?” कुसुमने नवऱ्याचं डोकं आपल्या खांद्यावर ठेवलं. “”तिन्ही सांजला असलं अभद्र नका बोलू. आणू आपण खंड्याला परत.” तिघांच्याही पोटात खंड्याच्या काळजीनं तोडत होतं. त्या रात्री कुणाच्याच डोळ्याला डोळा लागला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी. “”ह्ये माजं चार मणी मोडून बगा किती मिळत्यात.” “”तुज्या अंगावर एक तरी फुटका मणी राहू दे.” कुसुमने गळ्यातलं मंगळसूत्र काढून किसनच्या हातात दिलं. “”तुमाला माजी शपत हाय; डोक्यात काईबाई इचार आणाल तर.” किसन मंगळसूत्र घेऊन निघून गेला. इकडे गणेश नेहमीच्या ठिकाणी कबीरची वाट पाहत बसला होता. काहीवेळाने कबीर आला. “”कबीर, मला आज शाळेत नगं वाटतंय यायला.” “”काय झालं?” “”आमच्या खंड्याला सावकार घिऊन गेला काल.” काहीवेळ दोघेही शांत झाले. “”गण्या, आता रं?” “”मला नेतु का सावकाराकडं?” “”आपण येवडं लहान. आपलं काय ऐकणार हाय त्यो.” “”मला एकदा खंड्याला बघायचंय रं. त्यो कसा हाय त्ये. दोन-चार दिसात आबा पैसं जुळवील.” “”असं म्हनतुस? चल मग.” कबीर गणेशला घेऊन सावकाराकडं गेला. बाहेर खंड्या कुठंच दिसेना म्हणून वाड्याचं दार उघडून दोघे आत गेले. झोपाळ्यावर सावकार पानाचा बुकना तोंडात भरून बसला होता. त्या दोघांना बघून, “”कोण रं तुमि?” “”म्या किसनचा पोरगा, गणेश.” “”किसन्याचं पोरगं व्हय तू? हिथं कशाला आलास?” “”खंड्याला बगायला.” “”मग दिसला का?” “”भायर नव्हता. न्हाई दिसला.” किळसवाणं हसू चेहऱ्यावर आणत, “”आरं, कसा दिसणार! त्याला कालच इकला खाटकाला. जा जाऊन सांग तुज्या बापाला.” गणेशच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. बाहेर जाताजाता कबीर क्षणभर दाराजवळ घुटमळला. “”गण्या, थांब.” असं म्हणून तो पुन्हा दोन पावलं मागं आला. “”कुठल्या खाटकाला ईकलाय?” “”तू कोण इचारनार? नाव काय तुजं?” “”कबीर.” “”बापाचं नाव-गाव हाय का नाही?” “”उस्मान नाव हाय वडलाचं.” “”म्हंजी तू त्या उस्मान चाचाचं पोरगं व्हय? आरं, मग तुज्याच तर बापाला ईकलाय याचा खंड्या.” चेहरा खाली पाडून कबीर फिरला. तो गणेशला घेऊन घराकडं निघाला. काही अंतरावर. “”कबीर सायकल थांबीव.” कबीरने सायकल थांबवली. गणेश खाली उतरला आणि कबीरशी काहीच न बोलता निघाला. सायकल तशीच रस्त्यावर टाकून कबीर गणेशच्या मागे धावत गेला. “”गणेश, मला नव्हतं माहीत अब्बूनं खंड्याला आणलंय. इस्वास ठेव.” गणेशने रागात कबीरकडं बघितलं. “”तू आजपासनं दोस्त नाहीस माजा. वर्गातली पोरं बरोबर सांगत व्हती. दोस्ती नगस करू तुज्यासंग म्हणून.”
गणेशच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत कबीर बराच वेळ एकाजागी उभा होता. दुसऱ्यादिवशी गणेश शाळेत गेला. कबीर मात्र त्याला शाळेत दिसला नाही. कबीर कुणालाच काही न सांगता तालुक्याला निघून गेला होता. त्यादिवशी, “”साहेब, काम मिळल का?” “”कप-बशा धुवायचं आणि टेबल पुसायचं आहे. करणार का?” काम मिळाल्याच्या आनंदात कबीरचा चेहरा खुलला होता. “”करतो की.” असं म्हणून कबीर हॉटेलमध्ये कामाला लागला. पुढचा आठवडाभर कबीर शाळेत गैरहजर होता. “”हे घे आजचे पैसे.” कबीर पैसे मोजू लागला आणि मनातल्या मनात, “आणखी हजार रुपये कमी पडत्यात’ म्हणत विचार करत निघाला. रस्त्याने जाताना तो मध्येच एका सायकलीच्या दुकानासमोर उभा राहिला. “”सायकल इकायची हाय. किती मिळत्याल?” त्या दुकानदाराने, “”अकराशे’, म्हणताच पुढचा मागचा विचार न करता कबीरने सायकल विकून टाकली. कबीर घरी आला. “”अब्बू, ह्ये गणेशच्या वडलानी तीन हजार रुपये दिल्यात. गण्यानं शाळेत दिलतं माज्याकडं.” कबीरचा बाप पैसे मोजू लागला. “”उद्या घिऊन जा म्हणावं त्याच्या बैलाला.” दुसऱ्या दिवशी सकाळी कबीरने दावणीला बांधलेल्या खंड्याला सोडलं आणि त्याला घेऊन गणेशच्या घराकडं निघाला. खंड्याला जिवंत पाहून दोघा नवराबायकोच्या डोळ्यातून पाणी आलं. किसन खंड्याला गोंजारत होता. “”तू गणेशचा दोस्त ना? आन, तूला कुटं घावला खंड्या?” कबीर काहीच न बोलता निघून गेला…
आठवण
अमोल भालेराव