मंचर -पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथे गेल्या 15 दिवसांपासून वीजपुरवठ्यात सातत्याने बिघाड होत आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे येथील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
हा परिसर बिबटप्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून नागरिकांना राहावे लागत आहे. पिंपळगावात वायरमन असून एकही वायरमन गावात मुक्कामी नाही. श्रीराम विद्यालयाच्या मागे आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्गावरील वीजवाहिन्या तुटल्या आहेत. साकरे मळ्यातील पाझर तलाव शेजारील रोहित्र गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे.
त्यामुळे साकरे मळ्यातील कृषीपंप आणि घरगुती पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी बसविलेल्या मोटारी बंद आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर धावपळ करावी लागते, अशी माहिती ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल पोखरकर, रामदास बांगर यांनी दिली.