पुणे- राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा शनिवारी पुणे पोलिसांनी मुंबईत जाऊन जबाब नोंदविला. तसेच त्यांच्याकडून तपासाच्या अनुषंगाने माहिती घेण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि मंत्री बच्चू कडू यांचे वेगवेगळ्या नावाने साठ दिवस फोन टॅपिंग केल्याच्या आरोपावरून तत्कालिन पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून पुणे पोलिसांनी फोन टॅपिंगमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणात पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे उपायुक्त, तांत्रिक विश्लेषण विभागाचे तत्कालिन पोलिस निरीक्षकास कर्मचारी व इतर अशा सहा ते सात जणांचे जबाब नोंदविले होते.
दरम्यान, संबंधीत गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या पथकाने काँगेसचे नेते नाना पटोले यांचा शुक्रवारी मुंबईत जाऊन जबाब नोंदविला. त्यांच्याकडून गुन्ह्यांच्या अनुषंगाने माहिती घेण्यात आली. तसेच, या प्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांच्याकडून देखील माहिती घेण्यात आली आहे. पण, त्यांचा अद्याप जबाब नोंदविलेला नाही. त्यांचा देखील लवकरच जबाब नोंदविला जाणार असल्याची माहिती आहे.