मुंबई – महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकरच्या भूखंडावर थीम पार्क उभारण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इथे थीम पार्क उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर झाली. तेव्हा यावर पुढील बुधवारी सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सुनावणीनंतर तूर्तास ‘थीम पार्क’बाबत कोणताही निर्णय घेऊ नये, या अंतरिम मागणीवर आम्ही निर्देश देऊ असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी इथल्या मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड रेसकोर्स व्यवस्थापनाला १९१४ मध्ये ९९ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आला होता. महालक्ष्मी येथील रेसकोर्समधील जागेचा करार हा १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ ला संपुष्टात आला होता. त्यामुळे या जागेवर थीम पार्क उभारण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सद्यस्थितीत यातील ३० टक्के भूखंडाची मालकी बीएमसीकडे (बीएमसी) आहे.