Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा पायी मोर्चा २६ तारखेपासून निघणार आहे. या मोर्चाच्या भीतीने सरकारला धास्ती भरलेली दिसतेय. त्यामुळे सरकारकडून आता सकारात्मक वक्तव्य करण्यात येत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत. ओबीसी आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत.
मराठा समाजाला आम्ही या आरक्षणाबाबत शब्द दिला आहे. त्यामुळे जरागेंनी उगाच आंदोलन करण्याची भूमिका घेऊ नये. सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असताना आंदोलनाच्या पावित्र्यात जाण्यापेक्षा सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना केले आहे.
मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा निघणार आहे. २६ तारखेपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतला आहे. या मोर्चासाठी राज्यातून कोट्यवधी लोक मुंबईत दाखल होतील, अशी भीती सरकारला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना मोर्चा टाळण्याचे आवाहन केले असून आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे.
जरांगे पाटलांचे उत्तर…
शिंदे साहेबांचा शब्द मराठ्यांनी कधीच खाली पडून दिला नाही. खरा दोष त्या मंत्र्यांचा आहे, जे उपोषण सोडण्यासाठी आले होते. आमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही नेत्यांची होती, ते नेते आता कुठे गेले आहेत?, असा सवाल करत जरागेंनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उत्तर दिले आहे.
आम्ही किती दिवस सामंजस्याची भूमिका घ्यायची. या सामंजस्यासाठीच आम्ही सरकारला सात महिने दिले होते. परंतु आम्ही अजून किती वेळ द्यायचा. समाजाने त्यांच्या शब्दाचा मान सन्मान ठेवला आहे. न्यायासाठी आता आम्ही मुंबईकडे निघणार आहोत, अशी भूमिका जरांगेंनी मांडली.